मंबई शहर

भाकरी फिरविण्याची वेळ, नवीन नेतृत्व तयार करणार! शरद पवार यांचे सूचक वक्तव्य

काही व्यक्तींना पद असो अथवा नसो कार्यकर्त्यांमध्ये सन्मान असतो. तो सन्मान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला पुढील पायरीवर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे.

मुंबई: काही व्यक्तींना पद असो अथवा नसो कार्यकर्त्यांमध्ये सन्मान असतो. तो सन्मान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला पुढील पायरीवर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. संघटनेच्या माध्यमातून योग्य ती संधी देऊन एक नवीन नेतृत्व तयार केले जाईल. भाकरी ही फिरवावी लागते. ती फिरवली नाही तर करपते. ती भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. आता विलंब करून चालणार नाही. ते काम पक्षात करण्याचा आग्रह वरिष्ठ नेत्यांकडे केला जाईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी केले.

मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसर्फे आयोजित युवा मंथन कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांशी पवारांनी यांनी संवाद साधला. राज्याच्या कानाकोपऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेससाठी कष्ट करणारे, वेळ देणारे, लोकांमध्ये समरस होणारे कार्यकर्ते आहेत. पण त्यामध्ये काही बदल करण्याचे मत काही वक्त्यांनी व्यक्त केले. १९६० साली मी युवक काँग्रेसचा पदाधिकारी झालो, १९६४ साली युवक काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्राचा प्रमुख झालो आणि नंतर १९६६ साली राज्यातील युवकांचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. आयुष्याच्या उमेदीच्या काळात अनेक गोष्टींची आपल्याला माहिती व संधी नसते. पण निर्धार पक्का असला तर आपण अडचणींवर निश्चित मात करू शकतो. त्यामुळे पक्षाला नेतृत्व तयार करण्यासाठी तरूणांपासून सुरुवात करावी लागेल. जीवनात यशस्वी होण्यासाठी तरूणांनी विचारधारा आणि कष्ट या दोन गोष्टींचा आधार घेतला तर जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय ते थांबणार नाहीत.

 

मी पक्षाचे प्रांताध्यक्ष, इतर नेते आणि मुंबईचे कार्याध्यक्ष यांच्याशी चर्चा करून त्यांना सांगणार आहे की, जे लोक संघटनेत मागील सात-आठ वर्षे एकाच पदावर काम करत आहेत, त्यात बदल करावा. युवकांना संघटनेत घ्यावे. त्यातून त्यांना कामाची संधी द्यावी. या कामातून जो आपले स्थान प्रस्थापित करेल त्याला महानगरपालिकेत संधी द्यावी. मुंबई शहरात कार्यकर्त्यांची कमतरता नाही. मुंबई ही कार्यकर्त्यांची खाण आहे. मुंबई बदलत आहे पण इथले सामान्य कुटुंब टिकले पाहिजे. नव्या पिढीला प्रोत्साहित करून संधी देऊ. नवीन नेतृत्व तयार करून राज्याचा चेहरा बदलण्यासाठी आमचा युवक पुढे येतोय असा इतिहास निर्माण करू असे त्यांनी नमूद केले.