आढळराव लोकसभेची निवडणूक लढवायला इच्छुक नव्हते : रोहित पवार पराभवाच्या भीतीने अजित पवारांनी माघार घेऊन आढळरावांना पुढे केलं

Rokhthok Maharashtra 2 0

शिरूर  : उपमुख्यमंत्री अजित पवारांना पक्षातील यांना त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला किंवा पक्षातील एका बड्या नेत्याला शिरूरची जागा लढवायची होती मात्र शिरूर लोकसभेचा सर्व्हे समोर आला तेव्हा त्या सर्वेमध्ये असं दिसलं की खा. डॉ. अमोल कोल्हे ही निवडणूक तीन लाखांनी जिंकू शकतात; त्यामुळे त्यांनी बरीच शोधाशोध करूनही त्यांना कोणीच मिळालं नाही; म्हणून त्यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुढे केलं असं आ. रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ते डॉ. अमोल कोल्हे यांच्या शिरूर येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत बोलत होते.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना पुणे म्हाडाचे अध्यक्षपद देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले होते, त्यामुळे ते ही निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक नव्हते, मात्र अजित पवारांना उमेदवार सापडला नसल्याने त्यांनी आढळरावांना याबाबत विचारले असता, त्यांनी तिसऱ्यांदा पक्ष बदलून निवडणुकीची तयारी सुरू केली असंही आ. रोहित पवार यावेळी म्हणाले.

 

भाजपने अनेक नेत्यांना ईडीची भीती दाखवून पक्षात घेतलं, नेत्यांनीही तुरुंगापेक्षा भाजप बरा असं म्हणत पक्ष प्रवेश केला, भाजपने महाराष्ट्रातील स्वाभिमानी पक्ष फिडण्यासाठी अनाजी पंताची नीती वापरली, हे आता सर्वसामान्य मतदारांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्वसामान्य मतदार भाजपच्या या अनाजी पंताच्या वृत्तीला तुडवल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत खा. डॉ. अमोल कोल्हे हे या निवडणुकीत ३ लाखांच्या मताधीक्क्याने निवडून येतील असा विश्वास यावेळी आ. रोहित पवारांनी व्यक्त केला.

 

वळसे पाटलांनी परागसाठी पक्ष बदलला!
आदिवासी शाळांमधील मुलांना दूध पुरविणाऱ्या सहकारमंत्री वळसे पाटील यांच्या मित्राच्या पराग कंपनीला एका लिटरसाठी सुमारे १४० रुपये मिळत होते, ५० रुपये उत्पादन खर्च वजा जाता तब्बल ९० रुपयांचा नफा या कंपनीला मिळत होता. या कंत्राटामधून पराग कंपनीला तब्बल ९० कोटी रुपयांचा फायदा झाला. सरकारकडे एका खाजगी कंपनीला द्यायला ९० कोटी रुपये आहेत, मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांना अनुदानासाठी द्यायला ५ कोटी रुपये नाहीत आणि अशा कंपन्या पोसण्यासाठी यांना पक्ष बदलावा वाटला असा आरोप यावेळी आ. रोहित पवारांनी केला.

दौंडच्या खाजगी कारखान्यासाठी घोडगंगा बंद पडला
दौंड तालुक्यातील एका खाजगी कारखान्याला ऊस मिळावा म्हणून आ. अशोक पवारांच्या ताब्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना आर्थिक कोंडी करून जाणून बुजून बंद पडला असल्याचा आरोपही आ. रोहित पवारांनी यावेळी केला.

 

भरमसाठ लूटमार लरून तुटपुंजी मदत
आज शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही, दुधाला भाव नाही. शेतीशी संबंधित अनेक गोष्टींवर जीएसटी लावला जातो. एका हाताने भरमसाट लूटमार लाटून दुसऱ्या हाताने शेतकरी सन्मान योजनेच्या गोंडस नावाखाली अतिशय तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना देऊन त्यांना भुलविण्याचा प्रयत्न केला जातो असंही पवार म्हणाले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.