“भाजप मूल पळविणारी टोळी” नातू, पणतू, खापर पणतू, सूना सर्व पळवा, इथल्या जागा रिकाम्या करा – जितेंद्र आव्हाड यांचा टोला
मुंबई : (रोखठोक महाराष्ट्र न्युज)
भाजपवर ‘मुलं पळविणारी टोळी’ असा आरोप विरोधकांकडून करण्यात आल्यानंतर आता मुलंच नाही तर नातवंडही पळवू, असा इशाराच गिरीश महाजनांनी दिला होता. त्यावर जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे. पळून जाणारे तुम्हालाच लखलाभ असं आव्हाडांनी म्हटलं आहे.
नातू, पणतू, खापर पणतू, सुना सगळेच पळवा. त्यामुळे किमान इथली जागा तरी खाली होईल. पळून जाणारे सगळे तुम्हालाच लखलाभ असो. तसंही पळत आहेत ती श्रीमंताची पोरं आहेत, ही पोरं पळाली तरच गरिबांच्या पोरांना, आमच्यासारख्यांना संधी मिळेल, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं.
सामनाच्या अग्रलेखातून भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये असा सल्ला मित्रपक्ष शिवसेनेने भाजपला दिला. त्यावर बोलताना पाळण्याची दोरीच तुमच्या हाती आहे, तुम्हीच ठरवा काय करायचं, असा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला आहे.





