यवतमाळ जिल्ह्यातील सुकळी गावात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. बजरंग दलाचे कार्यकर्ते गजानन सुरोशे यांची गोवंश तस्करी रोखताना निर्घृण हत्या करण्यात आली.
माहितीनुसार, नागपूर-तुळजापूर महामार्गावरून गोवंशाने भरलेली बोलेरो पिकअप उमरखेडच्या दिशेने जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. वाहन अडवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर तस्करांनी पळ काढला. त्यानंतर गजानन सुरोशे यांनी स्वतः कारने पाठलाग सुरू केला.
सुकळी गावात पोहोचताच तस्करांनी आणि त्यांच्या साथीदारांनी गजानन यांच्या गाडीला वेढा घालत दगड आणि लाकडी दांडक्यांनी भीषण हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपींसह इतरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान, बजरंग दलाने आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून हत्या | गोवंश तस्करी रोखताना गजानन सुरोशे यांचा मृत्यू
