कारेगावच्या १९ ‘भिशी’ंचा करोडोंचा खेळ! ३९ जणांचे २० कोटी अडकले; नवले कुटुंबापलीकडे तपासाची गरज?

Rokhthok Maharashtra 8 0

कारेगावच्या १९ भिशींच्या व्यवहाराने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दामदुप्पट परताव्याचं आमिष दाखवून ३९ जणांची तब्बल २० कोटी ३४ लाख ६५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी सुलभा नवले, त्यांची दोन मुले आणि दोन सुना अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता प्रश्न फक्त नवले कुटुंबापुरता राहिलेला नाही.
एक-दोन नव्हे, तर तब्बल १९ भिशी चालत असल्याची माहिती समोर आली असून, त्यापैकी १७ भिशींची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे.
या १९ भिशींमधून नेमकी किती रक्कम जमा झाली? कोणाकडून किती पैसे घेतले? किती रक्कम परत केली? आणि उर्वरित पैसा नेमका कुठे गेला? या प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांच्या आर्थिक तपासातून समोर येणं गरजेचं आहे.
काही जवळच्या नातेवाईकांचीही आर्थिक भूमिका तपासण्याची मागणी तक्रारदारांकडून होत आहे. मात्र आरोप म्हणजे दोष सिद्ध होणं नव्हे; त्यामुळे प्रत्येक दाव्याची कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांच्या आधारे पडताळणी होणं आवश्यक आहे.
रांजणगावचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनीही भिशीतील आर्थिक व्यवहारांचा सविस्तर तपास सुरू असल्याचं सांगितलं असून, आणखी कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे.
आता सर्वात मोठा प्रश्न—१९ भिशींच्या करोडो रुपयांचा खरा हिशोब कुठे आहे? आणि या आर्थिक व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग होता का?

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.