पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली येथील जय मल्हार पर्यटन केंद्रातील वॉटर पार्कमध्ये एक धक्कादायक अपघात घडला आहे.
स्लाईड करताना पाण्याची पातळी कमी असल्यामुळे अश्विनी नपते या महिलेला गंभीर दुखापत झाली. त्या जोरात पूलमध्ये आपटल्याने त्यांच्या पाठीच्या चार मणक्यांना गंभीर इजा झाली असून त्यांचं अर्धे शरीर कायमचे निकामी झाले आहे.
या घटनेनंतर वॉटर पार्कच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या ठिकाणी ना रुग्णवाहिकेची सोय होती, ना तात्काळ प्रथमोपचाराची व्यवस्था उपलब्ध होती.
या घटनेमुळे वॉटर पार्कमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उन्हाळ्यात अशा ठिकाणी जाताना नागरिकांनीही सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्याची गरज आहे
