पुणे : (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
सोशल मीडियामुळे वाचन संस्कृती कमी होत असून, विद्यार्थीही अभ्यासापासून
दूर जात आहे. त्यामुळे त्याचा परिणाम गुणवत्ता वाढीवर होत आहे.
विद्यार्थ्यांनी वर्गांत शिकविलेला अभ्यासक्रम वाचून त्याचे लेखन आणि
चिंतन केले पाहिजे. स्पर्धेच्या जगामध्ये टिकण्यासाठी गुणवाढीबरोबर
गुणवत्ताही टिकविली पाहिजे, असे मत व्याख्याते अशोक बालगुडे यांनी व्यक्त
केले.
हडपसरमधील साधना विद्यालयामध्ये गुरुकुल प्रकल्पातील विद्यार्थ्यांसाठी
बाह्य तज्ज्ञ व्याख्याते बालगुडे यांनी अभ्यासाची त्रिसूत्री या विषयावर
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक
एस. बी. कुलकर्णी, पर्यवेक्षक डी. आर. क्षीरसागर, पी. बी. पवार, एस. आर.
मोहिते, गुरुकुल विभागप्रमुख ए. आर. उरमोडे, एम. जे. ढोणे, ए. एस.
वाव्हळ, शिक्षकवृंद आणि पाचवी ते सातवीतील विद्यार्थी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
बालगुडे म्हणाले की, विद्यार्थीदशेमध्ये अभ्यास हेच आपले मुख्य उद्दिष्ट
असले पाहिजे. अकरावी आणि उच्च शिक्षणासाठी आपल्या पालकांना कोणाकडे हात
पसरण्याची वेळ येणार नाही, अशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे.
स्वत:बरोबर गुरुजन, पालक आणि देशाचे नाव उज्ज्वल करा. शाळा-महाविद्यालये
तुम्हाला शोधत आली पाहिजे, अशी आपली गुणवत्ता राखा आणि भविष्यामध्ये आपण
अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगा, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना
दिला.
वाचन, लेखन आणि चिंतन हीच अभ्यासाची त्रिसूत्री : अशोक बालगुडे

Related tags :
48 Comments
Oldest