प्रतिनिधी- स्वप्नील कदम
महावितरणच्या थेऊर शाखेचा गलथान कारभार, कोलवडी परिसरात स्टार सिटी सोसायटी वस्ती, मांजरी कोलवडी शिवरस्ता या ठिकाणी असलेली सुमारे २५ ते ३० घरे आठवड्यातून दोन ते तीन दिवस अंधारात असतात. महावितरणच्या कारभाराने येथे राहणारे स्थानिक नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. त्या ठिकाणी असलेल्या रोहित्राची क्षमता कमी अन त्यावर असलेल्या वीजजोडांचा वापर वा मागणी जास्त आहे.तीन फेज पैकी सातत्याने कोणताही एक फेज बंद पडण्याने येथील रहिवाशी खंडित वीजपुरवठ्याने त्रस्त झाले आहेत. त्यांना पुरेशा दाबाने वीजपुरवठा उपलब्ध होत तर नाहीच, पण त्यांच्या तक्रारीची सुद्धा दखल वेळेत घेतली जात नाही.
वायरमनला फोन केला असता वायरमन सांगतात की , आम्हाला सध्या थकबाकी वसुलीचीच कामे सांगितली आहेत, दुरुस्तीकडे लक्ष द्यायचे नाही असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश असल्याने तुमच्या तक्रारीची वेळेवर दखल घेऊ शकत नाही. शिवाय थेऊर येथील महावितरण शाखेला गेल्या तीन महिन्यापासून अधिकारी नसल्याने, कुंजीरवाडीचे सहाय्यक इंजिनियर अलदार यांच्याकडे थेऊरचा चार्ज आहे. त्यांचेही या भागातील समस्यांकडे म्हणावे असे लक्ष नाही. त्यामुळे थेऊर महावितरण कर्मचारी आणि अधिकारी यांचे वीज पुरवठ्याबाबतीत दुर्लक्ष होत असल्याने येथील गावांची अक्षरशः पराकोटीची गैरसोय होत असताना देखील याकडे महावितरणचे दुर्लक्ष होण्याने जनता त्रस्त झाली आहे.
विशेष बाब म्हणजे या भागात सध्या ऊसतोड सुरू असून, ऊसतोडणी मजूर झोपड्या बांधून राहावयास आहेत. ते लोक आकडा टाकून सर्रास वीज जोड घेऊन वीजेचा वापर करत आहेत. मात्र, जे रहिवासी रितसर वीजजोड घेऊन विजेचा वापर करतात , त्यांना वीज उपलब्ध होत नाही. रोहित्राची क्षमता कमी असल्याने या भागात सतत फ्यूज उडणे,रात्री अपरात्री कधीही वीज जाणे,असा प्रकार होत असल्या मुळे येथील लोकांना पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होत आहे. शेतीचा परिसर असल्याने साप, विंचूचा उपद्रव भेडसावत असतो. यासंबंधी वीज कर्मचाऱ्यांना कळवूनही दखल घेतली जात नाही. वरिष्ठांना कळवले तर मोगम उत्तर देऊन टाळाटाळ करत असतात. अशाने येथील रहिवासी हतबल झाले आहेत. याची दखल वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे.
अन्यथा सर्व रहिवाशांना आंदोलन करण्याशिवाय गत्यंतर नाही , असे रहिवासी व्यक्त करत आहेत.गेले दोन दिवस रात्री आम्हाला वीज पुरवठा होत नाही..मात्र, ऊसतोडणी मजुरांच्या झोपड्यांना आकडा टाकून वीज पुरवठा होत आहे. तीन फेज पैकी एकाचं फ्यूज उडाला की ते लोक दुसऱ्या तारेवर आकडा टाकून वीज घेत असतात. आम्हाला मात्र रितसर कनेक्शन घेऊनही वीज पुरवठा होत नाही.
