मुंबई

उद्धव ठाकरे यांची ‘दिल की बात’ राजकारण ढवळून काढेल : संपादक संजय राऊत यांनी घेतली विशेष मुलाखत

मुंबई :  – दरवर्षीप्रमाणे यंदाही संजय राऊत उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतात. मात्र, यंदा उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख सोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही आहेत. त्यामुळे देश आणि राज्य स्तरावरचे विविध प्रश्न आणि सध्या कोरोना संक्रमण काळातील आव्हाने यावर त्यांची मुलाखत असणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी विशेष मुलाखत घेतली आहे. येत्या 27 जुलै रोजी शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे.

येत्या 25, 26 आणि 27 जुलै रोजी ही मुलाखत ‘सामना’ डिजीटलच्या माध्यातून प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती दिली आहे. यासंबंधी संजय राऊत यांनी फेसबुक पोस्ट देखील शेअर केली आहे. यात उद्धव ठाकरे यांची ‘दिल की बात’ राजकारण ढवळून काढेल, असा उल्लेख त्यांनी केला आहे. राऊत यांनी लिहलंय की, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घणाघाती मुलाखत ‘सामना’साठी घेतली. सर्वच प्रश्नांना दिलखुलास उत्तरे मिळालीत. उद्धव ठाकरे यांची ‘दिल की बात’ राजकारण ढवळून काढेल. करोनापासून राम मंदिरापर्यंत मुख्यमंत्री ठाकरे दणक्यात बोलले. मुलाखत 25 आणि 26 जुलै रोजी वाचता पहाता येईल.’

दरम्यान, मागच्या आठवड्यामध्ये संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. करोना महामारी, महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग, चीनचा पश्न या अनेक विषयांवर शरद पवार यांनी उत्तरं दिली होती. ‘एकच शरद सगळे गारद’ असे या मुलाखतीचे मुख्य शीर्षक होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ही मुलाखत 3 भागांमध्ये प्रसारित केली होती. याच मुलाखतीच्या पार्श्वभूमीवर बोलताना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सत्ता स्थापनेच्या नाट्यावर भाष्य केले होते. ‘तो’ ‘पहाटे झालेला शपथविधी, तेव्हा अनेकांनी शरद पवाय यांना अनेकांनी आरोपाच्या पिंजर्‍यात ठेवले होते. पण, तेव्हा हे शरद पवार योद्ध्यासारखे उभे राहून लढले. लॉकडाऊन, डेडलॉक तोडून त्यांनी सरकार स्थापन केले,’ अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची स्तुती केली होती.

‘ही खिचड़ी नाही, हे सरकार तीन पक्षांनी येत तयार केले आहे. ते पाच वर्षे टिकेल. सत्ता स्थापन प्रक्रियेविषयी शरद पवार यांची खुली मुलाखत घ्यायची होती. पण, काही कारणाने ती मागे पडली. पवार यांच्या खासगी मुलाखती शेकडो घेतल्यात, पण खुली मुलाखत आता घेत आहे. अन्य राजकीय नेत्यांच्याही मुलाखती घेणार आहे,’ असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते.

खरंच राजकारण ढवळून निघणार ?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली होती. यावर भाजपच्या काही नेत्यांनी परखड टीका केली होती. काहींनी तर, ही मुलाखत म्हणजे फिक्सिंग आहे, असे म्हटले होते. तर ही मुलाखत म्हणजे मॅनेज म्हटले होते. कारण, सामना हे शिवसेना पक्षाचे मुखपत्र आहे. त्यामुळे मुलाखत घेणारी व्यक्ती ही राजकीय व्यक्तीच होतीे. त्याजागी दुसरी तज्ञ व्यक्ती असती तर शरद पवार यांना आणखी चांगले प्रश्न विचारून अनेक बाबींचा उलघडा करून घेतला असता.

मात्र, ही मुलाखत मॅनेज असल्यामुळे काय बोलणार? असा प्रश्नही विरोधी पक्ष नेत्यांनी केला होता. त्यामुळे आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मुलाखतीवरून विरोधी पक्षनेते यांची काय प्रतिक्रिया असणार आहे? कारण, शिवसेना पक्षाचे मुखपत्र ‘सामना’ आहे तर मुलाखत घेणारे खासदार देखील शिवसेना पक्षाचेच आणि मुलाखत देणारे व्यक्ती अर्थात शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे असणार आहे. त्यामुळे मुलाखतबाबत अगोदरच प्रश्न उपस्थित होत आहे. तरीही, या मुलाखतीची उत्सुकता अनेकांना लागली आहे.

0 0 votes
Article Rating
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments