पोलिसांकडून अधिकाराचा होतोय का गैरवापर ?पोलिसांकडून अरेरावी करत पत्रकारास मारहाण ; ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन कडून कारवाईची मागणी
पोलिसांकडून अरेरावी करत पत्रकारास मारहाण
ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन कडून कारवाईची मागणी
रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाइन
औरंगाबाद:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनिर्बंध अधिकार मिळाल्याने औरंगाबाद पोलीस बेफाम झाल्याच्या घटना समोर येत आहेत. औरंगाबादमध्ये पोलिसांनी थेट पत्रकारालाच मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे सोशल मीडिया प्रमुख मनोज जाधव यांना ही मारहाण करण्यात आली आहे. या पोलिसांना आवरणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे
देवगडहून औरंगाबादला जात असताना मनोज जाधव यांची गाडी अडवण्यात आली. आपण पत्रकार असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं तसेच सोबतचं आयकार्ड देखील दाखवलं मात्र त्यानंतरही पोलिसांनी त्यांना मारहाण केली. माझं नाव आणि नंबर पाहा आणि तुला काय करायचं ते कर, अशी अरेरावीची भाषा यावेळी मारहाण करणाऱ्या हवालदारानं केली.
याप्रकरणी तिथंच बसलेल्या फौजदाराला विचारणा केली असताना त्यानेही हवालदाराला आवरण्याचे कष्ट घेतले नाहीत. मारहाण करणारे पोलीस गंगापूर पोलीस ठाण्याचे आहेत. यासंदर्भात गंगापूर पोलीस ठाण्याचे पीआय सुरवसे यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदीचे आदेश आहेत, मात्र पत्रकार अत्यावश्यक सेवांमध्ये येत असल्याने त्यांना वार्तांकनासाठी फिरण्याची मुभा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तसे आदेश आहेत, मात्र औरंगाबाद पोलिसांकडून मुख्यमंत्री तसेच पंतप्रधानांच्या आदेशाला हरताळ फासण्याचं काम करण्याच आलं आहे. याप्रकरणी संबंधित पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन तर्फे करण्यात आली आहे.
यासंदर्भात गंगापूर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.सुरवसे यांच्याशी प्रदेश सहसंघटक अनिल मोरे, संपर्कप्रमुख सागर बोदगिरे यांनी संपर्क साधला असता हवालदाराची ड्युटी बदलली आहे, तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार आहोत तसेच या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. याबाबत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.





