केंद्र सरकारच्या अडेलतट्टूपणामुळे पुणेकर कोविड लसीपासून दूरच – योगेश ससाणे

Rokhthok Maharashtra 1 0

पुणे ः प्रतिनिधी
धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती धरणाच्या पायथ्याशी असलेल्या नागरिकांची असते. त्याचप्रमाणे पुणेकरांची अवस्था झाली आहे. जगमान्य पुण्यामध्ये (हडपसर) कोविड लस तयार करण्यात आली आहे. मात्र, मोदी सरकारच्या अडेलतट्टु धोरणामुळे महाराष्ट्रालाच नाही, तर दस्तुरखुद्द पुणेकर कोरोनावरील लस मिळविण्याच्या प्रतिक्षेत आहेत, ही बाब दुर्दैवी आहे, असे मत नगरसेवक योगेश ससाणे यांनी व्यक्त केले.

ससाणे म्हणाले की, पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून १२५हून अधिक शासकीय केंद्रावर लसीकरण सुरू आहे. त्यामध्ये 45 वयोगटापुढील नागरिकांना लस दिली जात आहे. मात्र, पुरेशी लस उपलब्ध नसल्यामुळे अनेक नागरिक लस मिळविण्यासाठी वणवण भटकत आहेत. याबाबत महापौरांनी लस पुरेशा प्रमाणात मिळावी, अशी दोन-चारवेळा मागणी केली. मात्र, महापालिकेला पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद पडतील. येत्या 30 एप्रिलपर्यंत 45 वयोगटापुढील नागरिकांना लस मिळणे अपेक्षित आहे. मात्र, केंद्र सरकारच्या आडमुठे धोरणामुळे ते पूर्ण होणार नाही, असे चित्र आहे. त्यामुळे १ मे पासून १८ वयोगटापुढील सर्वांना लसीकरण करणे कसे शक्य होणार हा मोठा प्रश्न आहे. आज लस मिळविण्यासाठी पहाटेपासून रांग लावतात. मात्र, लस मिळत नसल्याने दररोज प्रत्येक केंद्रावरून शेकडो नागरिक परत जात आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पालिकेचा नगरसेवक म्हणून महापौर मुरलीधर मोहोळ आणि आयुक्तांकडे पुरेशी लस पुणेकरांसाठी उपलब्ध करून द्यावी. आज अवघ्या 100 नागरिकांना प्रत्येक केंद्रावर लस दिली जात आहे. मात्र, 1 मे नंतर 18 वयोगटापुढील सर्वांची लस घेण्यासाठी गर्दी होऊन गोंधळाची स्थिती निर्माण होईल, त्यासाठी लस मिळविण्यासाठी योग्य तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, सीरम इ्न्स्टिट्यूट कंपनीचे अदरबाबा पुनावाला यांची भेट घेऊन पुणेकरांना पुरेशी लस देण्याविषयी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.