पूरग्रस्तांसाठी तुळजापूर तालुक्यातील तरुणाई सरसावली

Rokhthok Maharashtra 19 0

उस्मानाबाद :(प्रतिक भोसले)

काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तु आणि मदत निधी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पोहचविण्यासाठी तरूणाई सरसावली आहे. तुळजापूर तालुक्यातून ग्रामीण भागातील युवक वर्गाने सोशल मिडियाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तुंचे किट धाराशिव येथील सामाजिक संस्थेकडे सुपूर्द केले.

तुळजापूर तालुक्यातील सलगरा, किलज, होर्टी, सावरगाव, वडगाव देव या सह तुळजापूर शहरातील तरुणांच्या समुहाने सोशल मिडियावरून पूरग्रस्तांना मदत देण्याचे आवाहन केले होते. अवघ्या २० ते २५ वर्ष वयोगटातील तरूणाईला सुचलेले हे सामाजिक भान लक्षात घेऊन समाजातील दानशूरांनी या तरुणांना सहकार्य केले. या शिवाय या तरुणांनी पॉकेट मनीतील काही भाग पूरग्रस्तांना देऊन आर्थिक हातभार लावण्याचे औदार्य दाखविले.

या मदतीच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी एकूण ७० किराणा किट देण्यात आले. यामध्ये गणेश तानवडे, ऋषीकेश घोडके, विशाल केदार, आकाश लंगडे, प्रतिक भोसले, कुणाल लोमटे, मनोज देवकते, अविनाश कुंभार, राम जळकोटे, प्रसाद राजमाने, अविष्कार फस्के, वैभव मर्डे, प्रकाश बंडे, विशाल पाटील, सारंग जोशी इत्यादी युवकांनी एकत्रित येत हे सामाजिक कार्य पार पाडले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.