“अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मंजुरी मिळावी – खा.डॉ.अमोल कोल्हे यांची अदिती तटकरे यांच्याकडे मागणी

Rokhthok Maharashtra 1 0

पुणे – गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास आराखडा मिळावी मंजुरी देण्याची मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली आहे.

डॉ. कोल्हे यांनी या संदर्भात राज्यमंत्री तटकरे यांना पत्र पाठवले असून सन २०१६ मध्ये ध्रुव कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रा. लि. या संस्थेने राज्यातील अष्टविनायक गणपती तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला होता. पायाभूत सुविधा व सुशोभीकरण अशा दोन भागात सुमारे रु. २४५ कोटी ५२ लक्ष रकमेच्या या आराखड्याला सन २०१७ मध्ये जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली होती. त्यानुसार राज्याच्या पर्यटन विभागाकडे सादर करण्यात आलेला प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे या आराखड्याला मंजुरी देण्याची मागणी डॉ. कोल्हे यांनी केली आहे.

या संदर्भात डॉ. कोल्हे म्हणाले की, अष्टविनायक गणपतींपैकी लेण्याद्रि, ओझर, रांजणगाव व थेऊर ही चार देवस्थाने शिरूर लोकसभा मतदारसंघात असून दरवर्षी लाखो भाविक व पर्यटक या देवस्थानांना भेट देतात. या भाविकांना, पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी अष्टविनायक गणपती तीर्थक्षेत्र विकास आराखडा लवकर मंजूर होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आपले प्रयत्न राहणार असून पालकमंत्री अजितदादा पवार यांनी आजवर शिरूर लोकसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी दिला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अष्टविनायक गणपती तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत भरीव निधी मिळेल याची खात्री आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.