“मोठे प्रकल्प राबविण्यात भाजपला अपयश – माजी आमदार मोहन जोशी यांची टीका”

Rokhthok Maharashtra 1 0

पुणे : गेल्या पाच वर्षात शहरातले मोठे प्रकल्प राबविण्यात भाजपला सपशेल अपयश आले असून स्मार्ट सिटी ही तर फसवी योजना आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि बैठका अशी मोहीम मोहन जोशी यांनी हाती घेतली आहे. या बैठकांमध्ये बोलताना भाजपच्या अपयशाचा पाढाच जोशी यांनी वाचला.केंद्र सरकारमध्ये पर्यावरण खात्याचे मंत्री मिळूनही मुळा मुठा नद्यांच्या सुधारणांची योजना प्रकाश जावडेकर पूर्ण करू शकलेले नाहीत.वाहतूक कोंडी दूर करणे, चोवीस तास पाणी पुरवठा योजना,रेल्वेचे उड्डाणपूल, पालिकेची उत्पन्न वाढ, झोपडपट्टी सुधारणा, नदीपात्रातील रस्ता अशा योजना मार्गी लागू शकलेल्या नाहीत. भाजपच्या राज्य सरकारच्या काळात मेट्रोचे काम तीन वर्ष रेंगाळले, असे मोहन जोशी यांनी सांगितले. भाजपच्या काळात महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली, त्यातूनच स्थायी समिती अध्यक्ष आणि पालिका आयुक्त यांच्यात वाद निर्माण झाले आहेत, असे मतही मोहन जोशी यांनी मांडले.

केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना प्रायोगिक पातळीवरच फसली आहे. या योजनेची प्रशासकीय रचना केंद्राला जमली नाही, योजनेतील पुण्यासह शंभर शहरांमध्ये स्मार्ट सिटीचा फज्जा उडाला आहे, असे मोहन जोशी यांनी सांगितले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.