#BREKING NEWS रोखठोक महाराष्ट्र# चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा ; खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Rokhthok Maharashtra 20 0


पुणे (प्रतिनिधी)
निसर्ग चक्रीवादळामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यात झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना पत्र पाठवून केली आहे.
आज निसर्ग चक्रीवादळाने मुंबई, कोकण परिसरात धडक दिल्यानंतर या चक्रीवादळाचा परिणाम पुणे जिल्ह्यात जाणवायला सुरुवात झाली होती. मात्र दुपारनंतर जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांवरील पत्रे व छप्परं उडून गेली. तसेच घरांचे, वाहनांचे व शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची तातडीने दखल घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना पत्र पाठवून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल प्रशासनाला देण्याची मागणी केली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना निसर्ग चक्रीवादळामुळे मोठा फटका बसला असून त्यातून सावरण्यासाठी त्यांना प्रशासनाने मदत करण्याची गरज आहे असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले. तसेच जुन्नर-आंबेगाव आणि खेडचे प्रांत अधिकारी यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा डॉ. कोल्हे यांनी घेतला. उद्या सकाळपासूनच पंचनामे सुरू करण्याच्या सूचना डॉ. कोल्हे यांनी प्रांत अधिकारी यांना केल्या आहेत.  तसेच खेडच्या पश्चिमपट्ट्यात मोठे नुकसान झाले आहे. एक महिलेचा मृत्यू झाला असून तीन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती खेडचे प्रांत संजय तेली यांनी दिली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.