“स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या स्मारकाचा विकास न केलेल्यांनी, माझ्या शिव-शंभु भक्तीविषयी, आणि हिंदुत्वाविषयी बोलणं योग्य नव्हे” “स्वतःच्या वयाचा मान राखून बोला, खासदार डॉ. कोल्हे यांचा आढळराव पाटलांना टोला”

Rokhthok Maharashtra 1 0

पुणे – लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या १५ प्रदीर्घ निष्क्रिय कारकीर्दीत स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या स्मारकाचा विकास करण्याचा प्रयत्न सोडाच पण साधा विचारही केला नाही, त्यांनी माझ्या शिव-शंभु भक्तीविषयी, माझ्या हिंदुत्वाविषयी बोलणं योग्य नव्हे. त्यामुळे आपल्या वयाचा मान त्यांनी स्वतःच राखावा अशा शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव यांचा उल्लेख टाळून त्यांना सुनावले.

खरं तर स्वराज्य रक्षक संभाजी ही माझी मालिका सन २०२० मध्येच संपली असताना त्यानंतर २ वर्षांनी या मालिकेच्या प्रमोशनसाठी मी स्मारकाचे नाव बदलणं अशी टीका म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे असे मला वाटते. धर्मवीर या उपाधीपेक्षा ‘स्वराज्य रक्षक’ हे विशेषण अधिक व्यापक स्वरुपाचे असून ज्या छत्रपती संभाजीराजांनी शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला एकही किल्ला जिंकू दिला नाही. औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूशी ८ वर्ष लढा देत स्वराज्याचे रक्षण केले. त्याअर्थाने विचार केला तर ‘स्वराज्य रक्षक’ हे विशेषण सर्वार्थाने उचित असेच आहे.

आढळराव पाटील यांचे नाव न घेता खासदार डॉ. कोल्हे यांनी त्यांच्यावर शालजोडीतून फटकेबाजी केली. ते म्हणाले की, ज्यांना १५ वर्षांत छत्रपती संभाजी महाराजांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वदूर पोहोचवण्यासाठी काडीचेही काम करता आले नाही. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळात केंद्रात व राज्यात दोन्हीकडे युतीची सत्ता असतानाही एकही महत्वाचा प्रकल्प त्यांना मार्गी लावता आला नाही. निष्क्रिय कारकीर्दीत मतदारसंघाचा विकास करता आला नाही म्हणूनच मायबाप मतदारांनी त्यांना घरी बसवले. ज्या पक्षाने ३ टर्म लोकसभेची उमेदवारी दिली, त्या शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांनी हिंदुत्वाचे सर्टिफिकेट देणे हास्यास्पद आहे. मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत एखाद्याला नैराश्य येऊ शकते, परंतु नैराश्यापोटी बेताल वक्तव्य करताना किमान स्वतःच्या वयाचा तरी मान राखावा ही माफक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सध्याच्या परिस्थितीत नेमकं आपण कुणाच्या बाजूने बोलायचं आहे हेच त्यांना ठाऊक नाही. माजी लोकप्रतिनिधी व ज्येष्ठ व्यक्ती म्हणून त्यांच्याविषयी आदर आहे. त्यामुळे
त्यांच्याविषयी मी प्रतिक्रिया देणं उचित ठरणार नाही. मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनता सूज्ञ आहे. कोण प्रामाणिकपणे विकासाचे कार्य करतंय हे त्यांना पुरेपूर माहिती आहे, असे त्यांनी सांगितले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.