पुणे

ती भंगली मने आज फटके आभाळ – विनोद अष्टुळ

शब्द, साहित्य आणि समाज यांना जोपासण्याची, संवर्धन करण्याची आणि योग्य दिशेने घेऊन जाण्याची जबाबदारी कवी आणि साहित्यिकांची आहे. आज तरुण सुज्ञान, स्व:कर्म आणि सुभक्ती या पासून कोसो दूर गेलेला आहे. त्यामुळे साहित्यातून सत्यशोधक विचारांचा जागर सातत्याने होणे आवश्यक आहे. कवी,गझलकारांनी अतिजलद प्रसिद्धीमागे न धावता, व्याकरणाचा बाऊ न करता आणि वाङ्मय चौर्य न करता आपल्या मनातील सत्य भावना सरळ साध्या मुक्तछंदात व्यक्त केल्यातरी सामान्य मराठी माणसांची हृदये फुलवतात. असे विचार साहित्य सम्राटचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी अष्टुळ यांनी आपल्या प्रास्ताविकेत व्यक्त केले.
साहित्य सम्राटचे १६५ वे कविसंमेलन निळकंठेश्वर शिव मंदिर गाडीतळ, हडपसर येथे संपन्न झाले. कविसंमेलनाचे अध्यक्ष ह.भ.प.सुभाष बडधे महाराज होते. ते अध्यक्षीय मनोगतात म्हणाले. संतांनी कुठेही शिक्षण न घेता समाजात खरा माणूस घडविण्याचे साहित्य निर्माण केले. संतांनी जेवढे मराठीवर जीवापाड प्रेम केले तेवढे आज साहित्यिक करत नाहीत. अशी खंत व्यक्त केली.

श्री.निळकंठेश्वर शिव मंदिराच्या प्रसन्न वातावरणात या वैचारिक खुल्या कविसंमेलनामध्ये अनेक नामवंत कवी सहभागी झाले होते. तरुण मिश्किल कवी गौरव नेवसे यांनी

शब्दामध्ये गोडवा आमच्या रक्तामध्ये इमानदारी
महाराष्ट्र आहे आमचा सगळ्या जगात लय भारी

महाराष्ट्र गौरव काव्य सादर केले. यानंतर प्रल्हाद शिंदे यांनी लोकांच्या लबाड वागण्याचा काव्यरूपी समाचार घेतला-

खर्चात वाढ झाली दुनिया ही बदलली
फुकटची चर्चा सारी महागाई वाढली

राहुल भोसले यांनी तर निर्जीव वाडयामुखी सजीव वृद्ध माणसांचे वास्तव विचार काव्यातून मांडले.

एक वाडा कोसळला, ढसढसा रडला
माणसे दिसेना तेव्हा गहिवरन गेला

 

सूर्यकांत नामुगडे यांनी शब्दांवर मनापासून प्रेम करा म्हणजे ते सुद्धा आपल्याला अविरत प्रसन्न ठेवतात. या आशयाची कविता सादर केली.

काहीच कसे कळत नाही
कोठून येतात शब्दांचे थवे
अक्षरे तीच तीच असतात
ती घेऊन येतात अर्थ नवे

पुढे किशोर टिळेकर आपल्या जीवनसाथी सोबत आयुष्याचा करार करताना कवीतून म्हणतात.

एकच घेईन हुंदका मी, सोडीन म्हणतो मोकळा श्वास
सुखदुःखाच्या शिदोरीतला देशील का मग एकच घास

माणूसे विद्वान झाली पण विचारांपासून दूर गेली हे समाजाचे वास्तववादी, विदारकचित्र काव्यातून प्रकट करताना विनोद अष्टुळ म्हणतात

चिमुकली टाळी होती अभंगाचे टाळ
ती भंगली मने आज फाटके आभाळ

आणि शेवटी बडधे महाराजांनी समाजातील अज्ञान आणि अंधश्रदध्येवर शाब्दिक वार करताना म्हणतात

पूजा झाली नैवेद्य आरती, दक्षिणेत खिशाची भरती
चमचाभर तीर्थ ओतून हाती, देवांचे कारभारी ढेकर देती.

 

या अशा विविध विषयांच्या आशयघन कवितांनी सर्व श्रोत्यांची मने जिकली. त्यामध्ये अशोक शिंदे, संजय भोरे, ताराचंद आटोळे, सचिन भालेराव, प्रल्हाद भालेराव, सुनील साबणे यांनाही अप्रतिम रचना साकारल्या. या कविसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन विनोद अष्टुळ यांनी तर गोड आभार अशोक शिंदे यांनी व्यक्त केले.