नाशिक

बापरे…. महाराष्ट्र हादरला, दोन महिन्याच्या बाळासह मातेची आत्महत्या नाशिकमधील हृदय पिळवटून टाकणारी दुर्घटना ः तिनं असं का केलं याचे उत्तर गुलदस्त्यात

नाशिक, दि. १३ ः चार चौघांसारखा तिचा- म्हणजे आकांक्षाचा (नाव बदलले आहे) संसार सुरू होता. एकत्र कुटुंबात ती रमली होती. नव्याची नवलाई संपली आणि दोघांच्या प्रेमाचं प्रतिक- त्यांची चिमुकली जन्मली. तिच्या संगोपनात रमली आकांक्षा. काही वर्षांतच दुसऱ्या मुलीचाही जन्म झाला. मोठी चिमुकली आता ‘ताई’ झाली होती. या मधल्या काळात काय बिनसलं कोणास ठाऊक… एक दिवस आकांक्षानं आपल्या दोन महिन्यांच्या चिमुरडीला गळ्याशी कवटाळत घरामागच्या शेततळ्यात जीव दिला… तिचा जीव गेला, पण बघ्यांच्या मनात राहिला एक प्रश्न- तिनं असं का केलं?… मात्र या घटनेनं प्रसूतीनंतरच्या नैराश्याबद्दलही चर्चा सुरू झाली.

आकांक्षा लहानपणापासून एकत्र कुटुंबात वाढली होती. घरी सर्वांची लाडकी. सासरीही एकत्र कुटुंब. लग्न, लग्नानंतरची नवलाई, सण-समारंभांत आकांक्षा मनापासून सहभागी होत होती. पहिली लहान मुलगी असताना दोन-तीन वर्षांच्या आतच पुन्हा पाळणा हलणार होता. या सगळ्यात एक झालं होतं, की आकांक्षाला डोकेदुखीचा त्रास सुरू झाला होता. सुरूवातीला बाळाच्या जागरणामुळे त्रास होतोय असं वाटलं, पण त्यानंतर डोकेदुखी वाढत गेली. गावापासून शहरापर्यंत, त्यानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातील डोकेदुखीशी संबंधित सर्व डॉक्टर, औषधं, तपासण्या झाल्या. पण उपयोग झाला नाही. सुरूवातीला दोन दिवस तिला बरं वाटायचं, पण नंतर पुन्हा त्रास व्हायचा. यात ती खूप त्रासली. दुसऱ्यांदा दिवस गेले, तसा आकांक्षाचा त्रास वाढत गेला. बाळंतपणातला त्रास होताच, पण डोकेदुखीचा त्रास असह्य होत राहिला. प्रसूती झाली, तिच्या ओंजळीत पुन्हा चिमुकली आली. दवाखान्यातून आकांक्षा माहेरी गेली, पण डोकेदुखीमुळे पुन्हा डॉक्टर-औषध हा खेळ सुरू झाला. आकांक्षा आई-भाऊ प्रत्येकाला एकच सांगायची- “मला त्रास होतो… माझ्यानंतर तुम्ही माझ्या दोन्ही मुलींना सांभाळा. त्यांना आईची माया द्या.” घरचे तिची समजूत काढायचे, पण तिचं पालुपद कायम राहिलं. आकांक्षा लहानगीला घेऊन सासरी जाणार म्हटल्यावर तिची आईही तिच्याबरोबर गेली.

नवरा आकांक्षाला आणि बाळाला भेटून मित्रांबरोबर फिरण्यासाठी बाहेर गेला होता. घरातले अन्य लोकही जवळच्या एका लग्नासाठी बाहेर गेले होते. आईशी रात्री उशीरापर्यंत गप्पा मारत असतानाही आकांक्षा म्हणत होती- “माझ्यानंतर सांभाळणार ना गं दोघींना?” आई तिला म्हणाली, “झोप. काहीही बोलत राहतेस!” छोटी मुलगी रडत होती, तिला दूध पाजायच्या बहाण्यानं आकांक्षानं आपल्याजवळ घेतलं. आईला मोठ्या मुलीजवळ झोपवलं. हवा मोकळी हवी म्हणून दरवाजा उघडा ठेवला. आईचा डोळा लागताच आकांक्षानं चिमुकलीला गळ्याशी कवटाळून घरामागच्या शेततळ्यात उडी घेतली. या प्रकरणात आकांक्षाच्या सासरच्या कुटुंबातल्या अन्य सदस्यांना पोलीसांनी कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्याखाली अटक केली.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. निलेश जेजुरकर म्हमाले की, “प्रसूतीनंतर काही स्त्रियांना नैराश्य येतं. त्यात काहींना गरोदर राहिल्यावर काही त्रास जाणवण्यास सुरूवात होते. त्याविषयी स्त्रीनं बोलण्याचा प्रयत्न केल्यास पुष्कळदा तिला ‘तू उगाच बाऊ करतेस,’ असं म्हटलं जातं. अशात आपलं कुणी ऐकायला तयार नाही, अशी भावना त्या स्त्रीच्या मनात निर्माण होते. अशा इशाऱ्यांकडे वेळीच लक्ष देणं आवश्यक आहे. अनेक स्त्रियांना प्रसूतीनंतर अपुरी झोप आणि इतर काही आरोग्य समस्यांचाही सामना करावा लागतो, ही बाब नाकारून चालणार नाही.”

स्त्रीरोग व प्रसूतीतज्ञ डॉ. रोहन बोरसे म्हणाल्या की, “या घटनेतल्या स्त्रीनं इतकं टोकाचं पाऊल का उचललं असेल हे माहित नाही. कारण प्रत्येक स्त्रीला आपलं बाळ महत्त्वाचं असतं. नवमाता आणि बाळाच्या आरोग्याचा विचार करता बाळाच्या जन्मानंतर ५-६ महिन्यांनी बाळाची भूक वाढत जाते, त्याचं वेळापत्रक बदलतं. याचा परिणाम आईवरही होत असतो. पोषणतत्त्वांची कमतरता, अपुरी झोप यातूनही स्त्रियांची प्रकृती खालावून त्यांना नैराश्याचा सामना करावा लागू शकतो.”