पुणे (प्रतिनिधी)-
भाजपचे खासदार संजय काकडे यांनी ‘जर काँग्रेसने सन्मानाने तिकीट दिलं तर पुण्यातून लोकसभा लढणार’, असं म्हटलं आहे. भाजपसाठी मी तन- मन-धन दिलं तरी, माझा विचार का होत नाही’ अशी खंतही त्यांनी बोलावून दाखवली आहे.
आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून आपण लायक उमेदवार असल्याचं सांगितलं आहे. ‘पुणे महापालिका निवडणुकीचे गिरीश बापट हे मुळीच शिल्पकार नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत बापट विरुद्ध काकडे हा सामना खरंच व्हावा यासाठी मी उत्सुक आहे’, असंही काकडे म्हणाले.
‘भाजप पक्षासाठी तन-मन-धन दिलं, तरी माझा विचार का होत नाही याचं दुःख आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझा सन्मान राखतील’, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
‘मी दुखी आहे, दुःखी माणूस जसा वेगवेगळ्या वाटा शोधतो तशा मी शोधल्या तर त्यात गैर काय आहे. मला जर भाजप किंवा काँग्रेसने तिकीट दिलं नाही तरी 2020 पर्यंत राज्यसभेवर आहेच आणि पुढेही राहीन’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
काही दिवसांपूर्वी संजय काकडे यांनी थेट प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावरच निशाणा साधला होता. ‘भाजप शिवसेना युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे हे दीड लाख मतांनी पराभूत होतील’, असा दावाच काकडेंनी केला होता. ‘दानवे यांच्या मतदारसंघाचा मी सर्व्हे केला आहे. माझा सर्व्हे कधी चुकत नाही’, असंही काकडे म्हणाले होते. काकडे यांच्या वक्तव्याने पुण्याचे राजकारण तापणार याची चिन्हे दिसू लागली आहेत.
