
रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
“ग्रामीण व शहरी भागातील मुलांमध्ये मैत्रीचा, ज्ञानाचा स्नेहबंध निर्माण करण्याचे कार्य हिवाळी शिबिरे करत असतात.” असे उदगार हवेलीचे उद्योगपती एल. बी. कुंजीर यांनी हिवाळी शिबिर समारोप प्रसंगी काढले. यावेळी कुंजीर यांनी वळती गाव येथे थोर समाजसेवक दादा गुजर यांनी १९८४ साली केलेल्या ग्रामसुधारणेच्या आठवणींना ही उजाळा दिला.
महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे साने गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर, माळवाडी, हडपसर येथे विद्यार्थ्यासाठी अनेक ज्ञानवर्धक, मनोरंजक उपक्रमांचे आयोजन केले जाते.यातीलच एक उपक्रम विद्यार्थ्यांचे विशेष हिवाळी शिबिर हे शिबीर वळती गाव ता.हवेली, जि.पुणे येथे आयोजीत करण्यात आले होते. शिबिरात ग्रामसफाई, वृक्षारोपन, विज्ञान व्याख्यान, आधुनिक सोयीयुक्त गोठा भेट, कुल्फी कारखाना भेट, ग्रामपंचायत माहिती, शेतकऱ्यांची मुलाखत, शेततळी व शेती विषयक माहिती, योगासने, ट्रेकिंग, शेकोटी, सामाजिक समस्यांवर आधारित पथनाट्य इ. गोष्टींचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामुळे मुले दैनंदिन वातावरणा पासून, तंत्रज्ञानापासून दूर निसर्गाच्या सहवासात उत्साहात नवीन गोष्टी जाणून घेण्यास, कौशल्य शिकण्यास, नवीन मित्र बनविण्यात रमून गेली होती. समारोप प्रसंगी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वाचनपेटी भेट देवून सामाजीक बांधीलकी शाळेने जपली.
या दोन दिवसीय निवासी शिबिरात ५४ विद्यार्थी व ३ शिक्षकांचा समावेश होता. शिबिरासाठी संस्थेचे चिटणीस श्री.अनिल गुजर, शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुरेश गुजर यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिराचे नियोजन श्रीमती सोनाली कुंजीर, सौ.रुपाली पवार व सौ.स्वप्नाली मेमाणे यांनी केले होते.
