बीडमध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून बारा किलोमीटर रस्ता तरी झाला का ? पंकजा मुंडे यांचा सवाल

Rokhthok Maharashtra 1 4
गेवराई :(रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
बीड जिल्हा हा लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा जिल्हा आहे. ही जाण केंद्र व राज्यातील भाजप सरकारला असल्यामुळेच कधी नव्हे तो कोट्यवधी रुपयांचा विकास निधी या जिल्हयात आला. मुंडे साहेबांचा धसका घेऊन प्रत्येक तालुक्यात विधान परिषदेची आमदारकी वाटून जिल्हयाचे वाटोळे करणा-या राष्ट्रवादीने बारा किलोमीटर तरी रस्ते केले का? असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक हजार ८७१ कोटी ३४ लाख रुपये खर्च करून बांधलेल्या येडशी ते औरंगाबाद या २११ किमी लांबीच्या महामार्गाचे लोकार्पण पंकजा मुंडे यांच्या हस्ते आणि औरंगाबाद जिल्ह्यातील बोरगाव- देवगाव लासुर  स्टेशन रा.मा. ३९ या ५७ कोटीच्या  व पैठण ते शहागड या २० कोटी रुपयांच्या  रस्त्याची सुधारणा या दोन्ही कामांचे भूमिपूजन ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे आज उत्साहात पार पडले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी यावेळी व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे उपस्थित जनतेशी संवाद साधतांना महामार्गाच्या निर्मितीमुळे मराठवाड्याच्या विकासाला गती मिळाली असल्याचे नमुद केले.
पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी आपल्या जिल्ह्याचा विकास कधीच केला नाही. मुंडे साहेबांचा धसका घेऊन प्रत्येक तालुक्यात विधान परिषद आमदारकी त्यांनी वाटली. जिल्ह्यात बारा आमदार दिले पण या बारा आमदारांनी बारा  किलोमीटर तरी रस्ते केले का हा सवाल आपण त्या नेतृत्वाला  केला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या सत्तेत  कधी प्रशासकीय इमारती दिल्या नाहीत. रस्ते, पाणी,वीज यासाठी झगडावे लागले. लाख दोन लाख देऊन बोळवण केली जायची मात्र केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आल्यानंतर हा जिल्हा गोपीनाथ मुंडेंचा जिल्हा आहे याची सत्तेला जाण होती म्हणून जास्तीत जास्त निधी जिल्ह्याला मिळाला.
विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल : प्रीतम मुंडे 
यावेळी बोलतांना खा. डाॅ. प्रितमताई मुंडे म्हणाल्या, माझे राजकीय वय काढणाऱ्या विषयी मला सांगायचे आहे की, मी चार वर्षात जेवढे खऱ्या कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले तेवढ्या खोट्या कामाचे उदघाटन तुम्ही केले असावे. परळीत राष्ट्रवादी संपवण्याचे  काम पंकजाताई मुंडे करणार आहेत. माझी लोकसभा उमेदवारी आणि प्रचार सुरू झाला आहे. पण विरोधक मात्र संगीत खुर्ची खेळत आहेत, त्यांचे डिपॉजिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
0 0 votes
Article Rating
4 Comments
Oldest
Newest Most Voted

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.