पुणे

4 शाळकरी मैत्रिणी घरातून पळून थेट राजस्थानला! पोलिसांनी 4 तासांत केला शोध

कल्याणमधून एक धक्कादायक पण दिलासादायक बातमी समोर आली आहे. शाळेच्या गणवेशात घरातून बाहेर पडलेल्या चार अल्पवयीन मैत्रिणी अचानक बेपत्ता झाल्याने पालकांसह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.
या मुली शाळेत न पोहोचल्याचे समजताच कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही तासांत मोठा उलगडा केला.
तपासात समोर आले की, चारही मुली कल्याणहून लोकमान्य टिळक टर्मिनसला गेल्या आणि तेथून अरावली एक्स्प्रेसने राजस्थानमधील अजमेरकडे देवदर्शनासाठी निघाल्या होत्या.
पोलिसांनी तातडीने राजस्थान पोलिस आणि रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. अखेर मारवाड जंक्शन येथे रेल्वे थांबताच चारही मुलींना सुखरूप ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून, या मुली घरातून कोणालाही न सांगता का निघाल्या याचा पुढील तपास सुरू आहे.