सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील भेंड या ‘आदर्श गाव’ातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माहिती अधिकार कायद्याची उघडपणे पायमल्ली होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ग्रामस्थ निलेश घुगे यांनी 6 जानेवारी 2026 रोजी RTI अंतर्गत ग्रामपंचायतीकडे 5 वर्षांच्या विकासकामांची माहिती मागितली होती. मात्र कायद्यानुसार 30 दिवसांत माहिती देणे बंधनकारक असताना तब्बल 111 दिवस उलटूनही एकही माहिती देण्यात आलेली नाही.
या प्रकरणात प्रथम अपीलनंतर गटविकास अधिकारी, कुर्डूवाडी यांनी 15 दिवसांत माहिती देण्याचे आदेश दिले होते. तरीही कोणतीही कारवाई न झाल्याचा आरोप आहे. BDO यांनी ग्रामसेवकावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई न करता जबाबदारी टाळल्याचेही समोर आले आहे.
याचबरोबर, सरपंचाच्या पतीकडून धमक्या दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच गावातील सार्वजनिक तालीम नासधूस करून कचऱ्याने बुजवण्यात आल्याचेही व्हिडिओ पुरावे समोर आले आहेत.
माहिती न मिळाल्याने प्रकरण राज्य माहिती आयोग, पुणे येथे पोहोचले असून, 25 एप्रिल रोजी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
या प्रकरणी चौकशी, निलंबन आणि गुन्हा दाखल करण्याच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
आता प्रशासन यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
