पुणे

9 वर्षांच्या प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत! पत्नीनेच नवऱ्याचा जीव घेतल्याचा आरोप

कानपूरमध्ये 45 वर्षीय व्यावसायिक मनीष गुप्ता यांची पत्नी निहारिका गुप्ता हिने चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या मनीष यांचा तब्बल 11 दिवस उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मनीष आणि निहारिकाचे 2017 मध्ये प्रेमविवाह झाले होते. त्यांना सहा वर्षांचा मुलगाही आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून निहारिकाचे सोशल मीडियावरून एका तरुणाशी संबंध असल्याचा संशय निर्माण झाला होता. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते.
5 जून रोजी मोबाईलवरील वादाने हिंसक रूप घेतल्याचा आरोप आहे. मनीष यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, हल्ल्यावेळी संबंधित तरुण फोनवर होता आणि त्यानेच निहारिकाला भडकवल्याचा दावा करण्यात आला आहे.
सुरुवातीला हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र मनीष यांच्या मृत्यूनंतर आता हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून कॉल रेकॉर्ड्स आणि तांत्रिक पुराव्यांची सखोल चौकशी सुरू आहे.
या संपूर्ण घटनेत सर्वात मोठे नुकसान झाले आहे ते सहा वर्षांच्या निष्पाप मुलाचे. वडिलांचा मृत्यू आणि आई तुरुंगात… एका कुटुंबाचे आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झाले आहे.