मुंबई

घरोघरी “समाजभूषण ” घडावेत – सुभाष देसाई

मुंबई, दि. 27;
‘समाजभूषण’ या देवेंद्र भुजबळ यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील व्यक्तींच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळून त्यातूनच घरोघरी समाजभूषण घडतील. स्वयंप्रेरणेने आणि समर्पित भावनेने कार्य करणा-या लोकांना सर्वांसमोर आणण्याचे काम या पुस्तकाने केले आहे, असे गौरवोद्गार उद्योग व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी आज काढले.
भरारी प्रकाशनातर्फे प्रकाशित निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लेखन आणि संपादन केलेल्या
‘समाजभुषण’ या पुस्तकाचे मंत्रालयात श्री देसाई यांच्याहस्ते आज प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

श्री. देसाई पुढे म्हणाले, प्रत्येक समाजातील घटक मिळून भारतीय समाज व्यवस्था तयार झाली आहे. यात प्रत्येकाचं काम ठरलेले असायचे. कासार समाजातील लोकांनी पुर्वापार बांगड्या भरण्याचा व्यवसाय केला आहे. या समाजाची मुळ प्रवृत्ती उद्योजकाची आहे. आज या समाजातील अनेक लोक समर्पित भावनेने कार्य करत विविध क्षेत्रात नावारुपाला आले आहेत. अशा लोकांचा आदर्श समाजापुढे आणण्याचे काम या पुस्तकाच्या निमित्ताने झाले आहे. अशा अनेक व्यक्ती अजुनही प्रकाशात आल्या नसतील. त्यांच्या कार्याचा उल्लेख असलेले पुस्तकाचे अनेक खंड प्रकाशित व्हावे अशी सदिच्छा व्यक्त करुन पुस्तक प्रकाशित केल्या बद्द्ल लेखकाचे आणि प्रकाशकांचे श्री. देसाई यांनी अभिनंदन केले.

यावेळी बोलतांना माहिती सचिव व महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे म्हणाले, कासार समाजातील व्यक्तींनी विविध क्षेत्रात भरारी घेतली आहे. या सर्वांची यशकथा
समाजभूषण या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांच्या हाती आली आहे. श्रीमती अलका भुजबळ यांनी कॅन्सर सारख्या आजारावर मात केली , श्री भुजबळ यांनी हलाखीच्या परिस्थितीतून वर येत संचालक पदापर्यंत काम केले आहे. ते नोकरीतून निवृत्त झाले असले तरी त्यांनी लेखन सेवा सुरु ठेवली आहे याचा उल्लेख करुन पुस्तक प्रकाशनासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या .

निवृत्त झाल्यानंतरही सतत चिंतन मनन आणि लेखन करणारे ,माजी संचालक श्री देवेंद्र भुजबळ यांच्या कामातून प्रेरणा मिळत असते असे सांगून माहिती संचालक ( प्रशासन) श्री. गणेश रामदासी यांनी लातूर पासून ते मलेशियापर्यंतच्या कर्तृत्ववान लोकांना या पुस्तकाच्या माध्यमातून समोर आणण्याचे काम समाजभुषण या पुस्तकाच्या माध्यमातून झाले आहे, असे नमूद केले.

प्रारंभी सर्वांचे स्वागत करून ,पुस्तकामागील प्रेरणा स्पष्ट करताना श्री भुजबळ यांनी सांगितले की, कासार समाजातील यशकथा हे एकंदरीतच बदलत्या भारतीय समाजाचे चित्रण आहे. आज सर्वच समाजातील शिकणाऱ्या ,नवे धाडस करणाऱ्या व्यक्ती पुढे येत आहेत, हे या पुस्तकावरून दिसून येईल. तसेच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी होता येते, ही प्रेरणा युवकांना मिळेल.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिल्पा नातू यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाशक लता गुठे यांनी केले.

या वेळी माहिती संचालक ( वृत्त)श्री दयानंद कांबळे, माहिती उपसंचालक(प्रशासन) श्री गोविंद अहंकारी, विशेष कार्य अधिकारी श्री नितिन शिंदे , श्रीमती अलका भुजबळ आदी उपस्थित होते .

भरारी प्रकाशनातर्फे प्रकाशित या पुस्तकात कासार समाजातील 35 बंधु भगिनींच्या यशकथांचे संकलन करण्यात आले आहे. सुहास भागवत यांचे लक्षवेधी मुखपृष्ठ असलेल्या या पुस्तकाची किंमत 200 रुपये आहे. भरारी प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे 200 वे पुस्तक आहे.