अहमदनगर
लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी व शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट हमीभाव मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजपासून राळेगणसिद्धी इथं उपोषण सुरू केलं आहे. उपोषणस्थळी उपस्थितांना संबोधित करताना अण्णांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकावर जोरदार टीका केली. ‘या सरकारला भ्रष्टाचारमुक्त देश नको आहे. त्यामुळंच लोकपाल कायदा लागू केला जात नाही,’ असा आरोप त्यांनी यावेळी केला.
राळेगणमधील यादव महाराज समाधी मंदिरासमोर अण्णांनी उपोषण सुरू केलं आहे. विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांनीही अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. राष्ट्रीय किसान महासभेनंही दिल्लीतील जंतरमंतर इथं अण्णांच्या मागण्यांना पाठिंबा देत उपोषण सुरू केलं आहे. उपोषण सुरू केल्यानंतर पहिल्याच भाषणात अण्णांनी भाजप सरकारवर तोफ डागली. ‘हे सरकार आंधळं आणि बहिरं आहे. त्यांना शेतकऱ्यांचे हाल दिसत नाहीत. त्यांचा टाहो ऐकायला येत नाही. या सरकारला केवळ उद्योगपतींची चिंता आहे. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या आश्वासनाचा सरकारला विसर पडला आहे,’ असं अण्णा म्हणाले. लोकपाल कायदा झाल्यानंतर राज्यात लोकायुक्त कायदा एक वर्षाच्या आत करावा, अशी तरतूद आहे. पण राज्यात सरकारला चार वर्षे होऊन गेली तरी कायदा करता आला नाही
– सरकारने उद्योगपतींचे २५ लाख कोटींचे कर्ज माफ केले, पण शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जात नाही.
– शेतकरी गाळात रुतला असून त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी एकदा संपूर्ण कर्जमाफी देणं आवश्यक आहे.
-शेतकऱ्यांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन देणे गरजेचे आहे.
– शरीरात प्राण असेपर्यंत लढत राहणार. ही लढाई ‘करेंगे या मरेंगे’ अशी असेल.
