मुंबई: (रोखठोक महाराष्ट्र न्युज)
9 नोव्हेंबर 2018 रोजी महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला 16 % आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसवून आरक्षण लागू केले. या निर्णयाचे सकल मराठा समाजाकडून स्वागत करण्यात आले. मात्र, आता राज्य सरकारने सर्व शासकीय विभागांना आदेश दिले आहेत की मराठा आरक्षणातून नोकरी देऊ नका. सरकारने असा लेखी व छुपा आदेश कुटनितीचा वापर करून मराठा समाजाची मोठी फसवणूक केली आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चा व मराठा ठोक मोर्चाने केला आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला मतदान न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सकल मराठा आंदोलकांनी सांगितले.
मराठा क्रांती मोर्चा व मराठा ठोक मोर्चाच्या वतीने सकल मराठा समाजातील आंदोलकांनी आज दुपारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केला.
‘मराठा क्रांती मोर्चा’चे समन्वयक महेश डोंगरे म्हणाले की, मराठा आरक्षण आंदोलनना दरम्यान ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते शासनाने परत घेऊ असे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप एकही गुन्हा मागे घेतला नाही. तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती, ती सुद्धा संबंधित कुटुंबांना मिळालेली नाही. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करुन घेऊ असेही राज्य सरकारने आश्वासन दिले होते, तेही पाळले नाही. त्यामुळे भाजप-शिवसेना सरकारच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा ठोक मोर्चाने आगामी लोकसभा निवडणुकीत युतीवर बहिष्कार टाकून मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप- शिवसेना या दोन्ही पक्षांना मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते बुथही उभा करु देणार नाहीत, असा इशारा दिला.
मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक संजय सावंत म्हणाले की, मराठा समाजाला फडणवीस सरकारने आरक्षण तर दिले पण हे आरक्षण कायद्याच्या कचाट्यात सापडल्याने न्यायालयातच अडकुन पडले आहे. आंदोलनादरम्यान 13 हजार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले मात्र अद्याप मागे घेतले नाहीत. आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या 42 कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारे मदत केली नाही. आता निवडणुकीची आचारसंहिता लागु होण्यापुर्वी सरकारने या संदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी आम्ही करत आहोत.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर मराठा समाजातील आंदोलक नाराज आहेत. कारण आंदोलनादरम्यान उध्दव यांनी घरी बोलवले होते मात्र त्यांनी अद्याप आपली भेटही घेतली नाही. क़़ाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आमच्या मागण्यांना समर्थन देतील त्यांनाच मराठा समाज मतदान करेल असेही या संघटनांच्या प्रतिनिधीनी स्पष्ट केले. प्रत्येक जिल्ह्यात आता बैठका घेउन मराठा समाजापर्यंत आपले म्हणणे पोहचवले जाईल. संपुर्ण राज्यात 3 कोटी मराठा आहेत त्यांच्यापर्यंत पोहचुन आपण शिवसेना आणि भाजपाला मतदान न करता या पक्षावर बहिष्कार घालावा अशी असे सांगणार असल्याचे मराठा समाजातील नेत्यांनी स्पष्ट केले.
