पुणे

पुण्यात उष्णतेचा पहिला संशयित बळी? आंबेगावातील घटना हळहळजनक

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.
आमोंडी गावात कांदा काढणीसाठी गेलेल्या एका महिला मजुराचा अचानक मृत्यू झाला आहे.

नकुशा बाळू सुपे असे मृत महिलेचे नाव असून त्या दुपारच्या कडक उन्हात शेतात काम करत होत्या.
काम सुरू असतानाच त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या जागीच कोसळल्या.

इतर कामगारांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

प्राथमिक माहितीनुसार हा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सध्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा असून त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, राज्यात उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळेत बाहेर न पडण्याचे, भरपूर पाणी पिण्याचे आणि तब्येत बिघडल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.