शिरूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घोडनदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याजवळ शेकडो बिस्किटांचे बॉक्स, मॅगी मसाल्यांची पाकिटे आणि इतर खाद्यपदार्थ नदीपात्रात फेकून दिल्याचे आढळून आले आहे.
स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी पाहणी केली असता या वस्तूंची मुदत संपलेली असल्याचे समोर आले. अन्न व औषध प्रशासनाच्या संभाव्य कारवाईच्या भीतीने हा कालबाह्य माल रात्रीच्या अंधारात नदीत टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकारामुळे नदीचे पाणी प्रदूषित होण्याचा धोका निर्माण झाला असून जलचरांच्या अस्तित्वावरही संकट ओढवू शकते. परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेची समस्या वाढण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन, नगरपरिषद आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
शिरूरमध्ये खळबळ! FDA च्या भीतीने कालबाह्य खाद्यसाठा नदीत फेकला?
