राज्यात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. मुंबई, पुणे, रायगड, सातारासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भाग जलमय झाले असून प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पाटण गावात पहाटे एका घरावर दरड कोसळली. घरातील तीन जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असून NDRF च्या 30 जवानांचे पथक घटनास्थळी बचावकार्य करत आहे.
मुंबईतील मानखुर्दच्या जनता नगरमध्ये तीन मजली इमारत कोसळून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच लहान मुलांचा समावेश असून एक जण जखमी आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमधील वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला आहे.
हवामान विभागाने आजही अनेक भागांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला असून पुणे जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी नदी-नाल्यांपासून दूर राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार! घरावर दरड, इमारत कोसळली, 6 मृत | शाळांना सुट्टी
