महाराष्ट्रात पावसाचा कहर! पुढील 24 तास धोक्याचे, रेड अलर्ट; शाळांना सुट्टी
राज्यात पुन्हा एकदा पावसाने धुमाकूळ घातला असून पुढील २४ तास अत्यंत धोक्याचे असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
पुणे आणि नाशिक घाटमाथ्यावर रेड अलर्ट, तर ठाणे, रायगड, धुळे, नाशिक, सातारा आणि जळगाव जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरसह काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात रेड अलर्टमुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत आदेश दिले आहेत.
नंदुरबार, वाशिम आणि अमरावती जिल्ह्यांत रात्रभर मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. अमरावतीतील धामक गावाचा संपर्क तुटून गावाला बेटाचे स्वरूप आले आहे.
प्रशासनाने नागरिकांना नदी-नाल्यांपासून दूर राहण्याचे, विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.





