मुंबई : – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 5537 नव्या रुग्णांची वाढ झाली असून ही विक्रमी संख्या आहे. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 1 लाख 80 हजार 298 वर गेली आहे. राज्यात आज 198 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत 8053 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 4.47 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज 2243 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात 79075 एवढे रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
राज्यात आज 198 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी 69 मृत्यू हे मागील 48 तासांतील आहेत. तर उर्वरीत 129 मृत्यू मागील कालावधीत असून राज्यातील मृत्यू दर 4.47 टक्के आहे. आज मुंबईत 69 जणांचे मृत्यू झाले आहेत. राज्यात सध्या 6 लाख 8 हजार 660 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 38396 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात 93 हजार 154 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील काही दिवसांपासून दररोज 5 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. देशात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्राचा अव्वल क्रमांक लागत असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यात येत आहे. कोरोना बाधिताची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्य सरकारने राज्यातील लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
