पुणे

कांद्यावरची निर्यातबंदी उठावी यासाठी निलंबन पत्करले, तिकीट मिळावं म्हणून बेडुक उडी  मारली नाही – डॉ.अमोल कोल्हे

करंदी – कांद्यावरची निर्यातबंदी उठावी यासाठी निलंबन पत्करले, तिकीट मिळावं म्हणून बेडुक उडी  मारली नाही, असं जाहीर वक्तव्य करत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला.

शिरुर तालुक्यातील करंदी गावात गावभेट दौऱ्यात असताना खासदार डॉ. अमोल कोल्हे बोलत होते.

मी पाच वर्षात काय केलं हे विचारता अडीच वर्षे कोरोनामध्ये गेली हे सोयीस्कर विसरल जात. अस सांगत गेल्या पाच वर्षात केलेल्या कामगिरीचा उल्लेख करत २० वर्षे आणि ५ वर्षे अशी तुलना करणाऱ्यांना चपराक लगावली.

दोन एकर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्याला केंद्र सरकारकडून सहा हजार रुपये पीएम किसान निधी दिला जातो, अर्थात दिवसाला १७ रुपये देऊन शेतकऱ्यांचा अपमान केला जातोय. एकीकडे दोन एकर कांदा उत्पादन करण्याऱ्या शेतकऱ्याचं ७ लाख २० हजार रुपयांचं नुकसान होत आहे. त्यावर बोलताना डॉ. कोल्हे यांनी दोन एकरचा हिशोब सांगितला. दोन एकर शेतात २४ टन कांदा उत्पादित केला जातो. एका किलोमागे ३० रुपयांचे नुकसान या केंद्र सरकारने केले अर्थात २४ टनाचे ७ लाख २० हजार रुपयांचे नुकसान होत आहे.

 

त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि मी संसदेत भांडलो सरकारला कांदे दाखवले आम्हाला निलंबित केलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आम्ही निलंबन होणे पत्करले पण तिकिटासाठी बेडूकउडी मारली नाही, असा टोला ही कोल्हे यांनी लगावला. आढळरावांनी आपल्या वीस वर्षाच्या कामाचाही लेखाजोखा मांडावा, अस आवाहनही केलं.