नगर (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला जबर धक्का बसणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते राधाकृष्ण विखे पाटील, विजय सिंह मोहिते पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मुहूर्त निश्चित झाला आहे. अहमदनगरमध्ये १२ एप्रिलला होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत राधाकृष्ण विखे पाटील तर अकलुज येथे १७ एप्रिलला होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या सभेत विजयसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आघाडीच्या वृत्तवाहिनीने दिले आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपूत्र सुजय विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आपल्या जिल्ह्यातील हे दोन्ही दिग्गज नेते असून काँग्रेस- राष्ट्रवादीसाठी त्यांचा पक्षबदल मोठा धक्का आहे. राधाकृष्ण विखे पाटील नगरमध्ये होणाऱ्या जाहीरसभेत भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती.
काही आमदारही राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती आहे. त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर लोकसभेच्या जागेचा तिढा न सुटल्यामुळे काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून त्यांना लोकसभेची उमेदवारीही देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे अहमदनगरची जागा होती. ही जागा सोडण्यास राष्ट्रवादीने नकार दिल्यामुळे सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २३ मे नंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा अशी त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची भूमिका आहे. पण २३ मे नंतर पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता असल्यामुळे ते आधीच प्रवेश करत असल्यानं याचा फटका निवडणुकीत बसणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे
