मुंबई | दोन अडीज महिन्यांच्या प्रदीर्घ लॉकडाऊननंतर आर्थिक चाकं पुन्हा रूळावर आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनश्च हरिओमचा नारा दिला. मात्र हा नारा तंतोतंत खरा होताना दिसून येत नाहीये. राज्यात जशी कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागली तसतसं काही शहरांमध्ये शासनाने पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याच्या निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर आता लॉकडाऊनचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल, असा सावध इशारा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.
लॉकडाऊन करण्याची अनेक नागरिक मागणी करू लागले आहेत तर लॉकडाऊन करू नये अशीही अनेक नागरिकांची मागणी आहे. लॉकडाऊन किती वेळा करावा हा मोठा प्रश्न शासन आणि प्रशासनासमोर उभा असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.
ज्या ठिकाणी लॉकडाऊन नव्याने सुरू करण्यात आले आहेत या ठिकाणी देखील कोरोनाची साखळी तुटलेली नसून उलटपक्षी लॉकडाऊनच्या भीतीने झालेल्या गर्दीतून मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. अर्थचक्र नव्याने सुरू करण्यात अनेक अडचणी येतात त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागणार आहे, असं ते म्हणाले.
नाशिकमधल्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर भुजबळ म्हणाले, ‘मुंबई प्रमाणे नाशिक शहरातील प्रत्येक दवाखान्यासाठी महापालिकेने संपर्क अधिकाऱ्याची नेमणूक करावी व रुग्ण व्यवस्था, प्रवेश, बिल्स, इत्यादी बाबींवर नियंत्रण ठेवण्याची सर्व जबाबदारी त्या अधिकाऱ्यांवर असेल. त्यांचे संपर्क क्रमांक नागरिकांकडे असावेत’.
