मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बारावीच्या परीक्षेतील यशस्वींचे अभिनंदन संधीचे सोने करा, देशाचे भविष्य उज्वल करा!

मुंबई, दि. ८: – बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

मुख्यमंत्री संदेशात म्हणतात, आयुष्यात परीक्षेतील यशाला महत्व असतेच. परीक्षा भविष्यात येणाऱ्या आव्हानांची तयारी करून घेते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. यानंतर सुरु होणाऱ्या शैक्षणिक वाटचालीसाठी आणि आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये भविष्य घडवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. या वाटचालीतून तुम्हाला आपल्या कुटुंबियांसह, समाज आणि देशाचे भविष्य उज्वल करण्याची संधी मिळणार आहे, या संधीचे आपण सोने कराल, हा विश्वास आहे. काहींना या टप्प्यावर यशाने थोडक्यात हुलकावणी दिली असेल, अशांनीही खचून न जाता पुन्हा एक संधी म्हणून नव्या जोमाने तयारी केल्यास, यश तुमचेच असेल. त्यासाठीही शुभेच्छा.
0000