पुणेमहाराष्ट्र

संविधानाची सर्वोच्चता व सार्वभौमत्व जपायला हवे : प्रा. डॉ. प्रकाश पवार अण्णासाहेब मगर महाविद्यालयात दोन दिवस संविधान जागर

लोकशाहीत संसदेला महत्त्व आहे पण संसदेपेक्षा संविधान सर्वोच्च आहे. धर्मनिरपेक्षता हे या संविधानाचे वैशिष्ट्ये असून संविधानाची सर्वोच्चता व सार्वभौमत्व जपायला हवे. घटनेतील स्वातंत्र्य समता बंधुता ही मूल्ये पाश्चात्य राष्ट्रातून आलेली नसून ती भारतीय परंपरेनेतून आलेली आहेत. राजकीय लोकशाही पेक्षा सामाजिक लोकशाही, आर्थिक लोकशाही प्रस्थापित व्हायला पाहिजे. असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्ताने दोन दिवस संविधान जागर करत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने वरिष्ठ विभागासाठी ‘भारतीय राज्य घटनेचा अर्थ आणि अन्वयार्थ’ या विषयावर शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश पवार, व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रा. राहुल नरंगळकर कनिष्ठ विभागासाठी अनुराधा जाधव यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. विलास आढाव यांच्या हस्ते या व्याख्यानमालेचे उदघाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे होते.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समता, न्याय, बंधुता यासह सामान्य नागरिक हाच राज्यघटनेचा केंद्रबिंदू मानला. भारतीय समाजव्यवस्थेत धर्म, जात, प्रांत, लिंगभाव आणि वर्ग अशी विविधता आहे. या सर्व विविधतेला एकात्म व एकसंध ठेवण्याचे काम संविधान करत आहे. असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. विलास आढाव यांनी केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी आपण संविधानाने दिलेल्या अधिकारांच्या आग्रहाबरोबर कर्तव्यांचेही पालन केले पाहिजे. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमच्या सुरुवातीला संविधानाच्या उद्देशिकेचे डॉ. शुभांगी औटी यांनी समूह वाचन केले. सलग दोन दिवस दोन हजार विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेच्या समूह वाचनात सहभाग घेतला.

या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा.अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे, डॉ. लतेश निकम, डॉ.सविता कुलकर्णी,डॉ. रमाकांत जोशी, डॉ. नाना झगडे, प्रा. संगीता देवकर, प्रा.अण्णासाहेब निंबाळकर, डॉ. वंदना सोनवले, कार्यालयीन अधीक्षक गणेश साबळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विशाल झेंडे यांनी केले तर आभार प्राध्यापक डॉ. लतेश निकम मानले. परिचय प्रा. मधुमंजिरी ओक यांनी करून दिला. कार्यक्रमाचे संयोजन उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी व प्रा. संगीता देवकर यांनी केले.