पुणे

उरुळी येथे पाच कामगारांचा आगीत होरपळून मृत्यू बाहेरून मालकाने लावले होते कुलूप

हडपसर/पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)

पुण्याजवळ एका साडीच्या दुकानाला आग लागून या दुकानात काम करणाऱ्या 5 कामगारांचा मृत्यू झाला आहे. सासवड रस्त्याला लागून असलेल्या ऊरळी देवाची भागातील राजयोग होलसेल साडीच्या दुकानामध्ये ही आग लागली होती. झोपेत असताना ही आग लागल्याने कामगारांना दुकानाबाहेर पडता आले नाही. धुराने गुदमरून आणि होरपळून या पाचही जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीमध्ये 3 कोटींच्या संपत्तीचे नुकसान झाले असावे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आगीमुळे ज्या कामगारांचा मृत्यू झाला आहे त्यांची नावे राकेश रियाड (वय 22),धर्मराम वाडियासार (वय 25),राकेश मेघवाल (वय 25), सूरज शर्मा (वय 25) धीरज चांडक (वय 23 ,रा. लातूर) अशी आहेत. धीरज चांडक सोडून इतर चौघेही मूळचे राजस्थानचे राहणारे होते. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आग लागली तेव्हा पाचही कामगार गोडाऊनमध्ये झोपले होते. या कामगारांना आग लागल्याचं कळालं होतं मात्र चोरी होऊ नये म्हणून गोडाऊनला बाहेरून कुलूप लावण्यात येतं. या कामगारांनी मॅनेजरला फोन लावला. दुकानाला आग लागलीय आणि आम्हाला बाहेर येता येत नाहीये असं ते फोनवर ओरडत होते. मॅनेजर दुकानापाशी येऊन कुलूप उघडेपर्यंत आग सर्वत्र पसरली होती. त्यामुळे या कामगारांचा दुकनामध्येच मृत्यू झाला. या कामगारांनी खिडक्यांमधून बाहेर पडण्याचाही प्रयत्न केला होता,मात्र ते अयशस्वी ठरले.

हे दुकान सुमारे सात हजार स्क्वेअर फुटाचे आहे. दुकानामध्ये  साडी  आणि रेडीमेड कपड्याचे दालन होते. या दुकानाच्याच गोदामामध्ये सगळे कामगार राहात होते. उरळी देवाची येथील भाडळे यांच्या मालकीचे हे दुकान असून सुशील नंदकिशोर बजाज व भवरलाल हजारीलाल प्रजापती यांनी ते चालवण्यासाठी भाडेतत्त्वावर घेतले होते.

0 0 votes
Article Rating
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments