कराड, दि. ५ : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्यावतीने कराड येथे ३१ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन यशवंतराव चव्हाण साहित्य नगरीत शुक्रवार, दि.९ व शनिवार, दि.१० मे रोजी होत असून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलन अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक प्रवीण गायकवाड आहेत तर स्वागताध्यक्ष सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आहेत.
यावेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी अर्थमंत्री आ. जयंत पाटील, आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, ऍड. उदयसिंह पाटील, न्यूज १८ लोकमतचे संपादक मंदार फणसे, लोकशाही न्यूजचे संपादक विशाल पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, भाजप किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे.
या साहित्य संमेलनात साहित्य संमेलन शुभारंभ, ग्रंथदिंडी, उद्घाटन समारंभ, कवी संमेलन, कथाकथन, खुले चर्चासत्र, परिसंवाद अशी साहित्यिक मेजवानी होणार असून मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे, प्रदेश उपाध्यक्ष हनुमंत चिकणे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. नितीन नाळे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विक्रम शिंदे, कोल्हापूर विभागीय अध्यक्ष विकास भोसले, सातारा जिल्हाध्यक्ष संदीप पवार, सातारा जिल्हा महिला अध्यक्षा सुषमा अलेकरी यांनी केले आहे.
या साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यातून ३५० हून अधिक कवी व ४०० साहित्यिक कराड येथे येणार असून शुक्रवार, ९ मे रोजी सकाळी ८ वाजता साहित्य संमेलन शुभारंभ आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण साहेब समाधीस्थळ प्रीतिसंगम येथून होणार आहे. शुक्रवार, दि.९ मे रोजी सकाळी ९ वाजता भव्य ग्रंथदिंडी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, दत्त चौक कराड येथून सुरु होणार असून यशवंतराव चव्हाण साहित्य नगरी टाऊन हॉलपर्यंत ही ग्रंथदिंडी निघणार आहे.
सकाळी १० वाजता पहिले सत्र कवी संमेलन होणार असून कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी मुंबई येथील सुप्रसिद्ध कवी राजश्री बोहरा आहेत. दुसरे सत्र दुपारी १२.३० वाजता होणार असून या कवी संमेलनाचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध ग्रामीण कवी लक्ष्मण हेमाडे, मंगळवेढा, जि. सोलापूर हे भूषविणार आहेत. दुपारी दोन वाजता खुले चर्चासत्र होणार असून मुंबई येथील ज्येष्ठ विचारवंत डॉ. अलका नाईक या अध्यक्षस्थानी आहेत. दुपारी ३ वाजता नाशिक येथील प्रसिद्ध ग्रामीण कथाकार नवनाथ नाईकर यांचा कथाकथनाचा कार्यक्रम होणार आहे.
दुपारी ४ वाजता शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. यावेळी राज्यभरातील विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. सायंकाळी ७ वाजता दैनिक लोकमत, पुणेचे संपादक संजय आवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसंवाद होणार असून ‘सशक्त लोकशाहीसाठी अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गरज व भूमिका’ या विषयावर विस्तृत चर्चा होणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मुंबई येथील ज्येष्ठ विचारवंत दत्ता बाळ सराफ हे आपले विचार व्यक्त करणार आहेत. रात्री ९ वाजता कवी संमेलनाचे तिसरे सत्र होणार असून या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी कराड येथील प्रसिद्ध कवी व गझलकार फरजाना इकबाल डांगे या असतील.
दुसऱ्या दिवशी शनिवार, दि.१० मे रोजी सकाळी ९.३० वाजता कवी संमेलन पहिले सत्र गोवा येथील प्रसिद्ध कवी चित्रा क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सकाळी ११.३० वाजता दुसरे सत्र
कवी संमेलन पुणे येथील प्रसिद्ध कवी सूर्यकांत नामुगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. तिसरे सत्र कवी संमेलन दुपारी १२.३० वाजता कराड येथील सुप्रसिद्ध कवयित्री सौ. विजया पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
दुपारी ३ वाजता माजी खा. राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून यावेळी ‘कृषक समाज काल आज आणि उद्या’ या विषयावर विस्तृत मंथन होणार असून या परिसंवादासाठी दैनिक लोकमत, कोल्हापूरचे माजी संपादक वसंत भोसले, न्यूज १८ लोकमतचे संपादक मंदार फणसे, शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी चार वाजता साहित्य संमेलनाचा समारोप होणार असून यावेळी खा.श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. मनोज घोरपडे, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ऍड. उदयसिंह पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख हे उपस्थित राहणार आहेत. या साहित्य संमेलनाचा आस्वाद घेण्यासाठी साहित्यिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने केले आहे.