पिंपरी (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज):-
‘जय भवानी जय शिवाजी’ नावाने राजकारण करणाऱ्या शिवसेनेने मावळ लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांचा वारू रोखण्यासाठी त्यांच्या शालेय जीवनातील फोटोंचा वापर करून वैयक्तिक टीका करत सोशल मीडियात फोटो व्हायरल केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा कधीही अवमान केला नाही. मात्र त्याच शिवाजीचे सैनिक असणाऱ्या शिवसेनेने एका तरुण मुलीची बदनामी करत पार्थ पवार यांच्या महाविद्यालयीन जीवनातील काही फोटो सोशल मीडियात व्हायरल केले. या राजकीय चळवळीत संबंधित तरुणीचे नाहक बळी दिला व तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले…. महिलांचा सन्मान करता येत नसेल तर अपमान तरी करू नका असा मोलाचा सल्ला मावळच्या जनतेने शिवसैनिकांना दिला.
मावळ लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नवखे उमेदवार पार्थ पवार यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे शिवसेनेचे उमेदवार व त्यांचे शिवसैनिक हतबल झाले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील अनेक निष्ठावान शिवसैनिक नाराज असल्याने शिवसेनेचे उमेदवार यांची संपूर्ण भिस्त भाजपच्या मतांवर आहे. तर बुलेट पार्थ पवार यांच्याकडे राष्ट्रवादीने केलेल्या विकासाचे पाठबळ राष्ट्रीय काँग्रेसची साथ, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी संघटना, मनसे कवाडे, गवई गटाची साथ यामुळे मावळात पार्थ पवारांचा विजय निश्चित होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विरोधी उमेदवारांचे शिवसैनिक सैरभैर झाले आहेत.
पवार कुटुंबीयांनी मावळ लोकसभेत एक आमदार असतानाही पार्थ पवार यांना उमेदवारी देऊन मोठी जोखीम स्वीकारली आहे. पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील गट-तट विसरून सर्वजण एकदिलाने कामाला लागले आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस, शेकाप, मनसे व सर्व मित्रपक्षांच्या यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहेत. परिणामी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने विरोधी युवा उमेदवार पार्थ पवार यांचा वारू रोखण्यासाठी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील खाजगी फोटो सोशल मीडियात व्हायरल करून लोकांची मन भडकावण्याचे उद्योग सुरू झाले आहेत.
शिवसेनेविरोधात नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण….
शरद पवार व अजित पवार यांनी निवडणुकीत कधीही विरोधकांच्या व्यक्तिगत आयुष्यात डोकावण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. उलट विकासाच्या मुद्द्यावर राजकारण केले. परंतु भाजप-शिवसेनेच्या नेते व कार्यकर्त्याकडून सोशल मीडियात निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात व्यक्तिगत टीका केल्याने समाजात असंतोषाचे वातावरण तयार झाले आहे. या आरोप-प्रत्यारोपाच्या परिणाम कार्यकर्त्यावर हातघाईवर येण्याची शक्यता निर्माण झाल्याने पिंपरी-चिंचवडसह मावळ लोकसभेत हा वाद शिगेला पोहोचला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी शिवसेनेकडून झालेल्या व्यक्तिगत टीकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
