पुणे

जेष्ठ समाजवादी नेते, विचारवंत प्रा.ग.प्र. प्रधान सर …… मास्तर म्हणजे त्यागमूर्ती – प्रा.सुभाष वारे

अलीकडील काळात मास्तर या शब्दाची प्रतिष्ठा पुर्वीसारखी राहिलेली नाही. मात्र फर्ग्यूसन कॅालेजसारख्या मान्यता प्राप्त महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना ज्यांनी इंग्रजी विषय प्रभावीपणे शिकविला त्या प्रा. ग. प्र. प्रधान सरांना मात्र त्यांचे निकटचे स्नेही आणि विद्यार्थी अतिशय आदराने आणि अभिमानाने प्रधान मास्तर असेच संबोधायचे. प्रधान सरांचा शिष्यगण अवघ्या महाराष्ट्रात पसरलेला होता. तो जसा फर्ग्युसन कॅालेजातील होता तसाच तो राष्ट्र सेवा दलातील व समाजवादी चळवळीतीलही होता. याच त्यांच्या शिष्यांनी प्रचारासाठी स्वतः पुढाकार घेऊन प्रधान मास्तरांना पुणे पदवीधर मतदारसंघातून तीनदा विधानपरिषदेवर पाठविले होते. प्रधान सर 18 वर्षे आमदार होते. चवथ्यावेळी सुध्दा पक्षाने त्यांना तिकिट देऊ केले होते पण आता सक्रिय राजकारण पुरे झाले म्हणत प्रधान सरांनी आपल्या सहकाऱ्यासाठी ती जागा सोडून दिली आणि स्वतः साधना साप्ताहिकाची जबाबदारी स्वीकारली. एकोणीसशे बेचाळीसच्या ब्रिटीशविरोधी चले जाव आंदोलनात सहभाग घेतला म्हणून प्रधान मास्तरांना तुरुंगवास सोसावा लागला होता. 1975 साली लादल्या गेलेल्या आणीबाणीच्या काळातही नागरिकांचे लोकशाही अधिकार अबाधित रहावेत यासाठी सत्याग्रह केल्याने मास्तर तुरुंगात गेले होते.

मास्तरांची जडणघडण राष्ट्र सेवा दलाच्या शाखेवर झालेली. महाराष्ट्रातील लोकशाही समाजवादी चळवळीचे ते एक प्रमुख नेते होते. बेचाळीसचा लढा असो की आणिबाणीविरोधी सत्याग्रह असो, समाजवादी चळवळीच्या नेत्यांचे त्यातील योगदान कधीही विसरता न येण्याजोगे आहे. साधनशुचिता हा मास्तरांच्या व्यक्तीत्वाचा स्थायीभाव असल्याने स्वातंत्र्यसैनिक म्हणून मिळणारे मानधन स्वीकारावे की न स्वीकारावे असा संभ्रम त्यांच्या मनात निर्माण झाला. यासाठी त्यांनी त्यांचे आणि समाजवादी चळवळीतील सर्वांचेच मार्गदर्शक राहिलेल्या एस. एम. जोशींचा सल्ला घेतला. एस. एम. अण्णांनी सांगितले, तुला व्यक्तिगत खर्चासाठी स्वातंत्र्यसैनिक म्हणून मिळणारे मानधन वापरायचे नसेल तर नको वापरुस. पण महाराष्ट्रातील अनेक निष्ठावान कार्यकर्ते आणि सेवाभावी संस्था यांना नेहमीच आर्थिक सहाय्याची गरज असते त्यांच्यासाठी तू हे मानधन वापरु शकतोस. प्रधानसरांनी एस एम अण्णांचे ऐकले आणि आयुष्यभर स्वातंत्र्यसैनिक म्हणून मिळणारे मानधन बॅकेच्या एका स्वतंत्र खात्यात ठेवले आणि त्यातून असंख्य गरजू कार्यकर्ते आणि संस्थांना आर्थिक सहाय्य केले. त्यानंतर आपल्या मृत्यूपूर्वीच प्रधान सरांनी किमान एक कोटी रु. किंमतीचे आपले राहते सर साधना साप्ताहिकास देऊन टाकले. त्याकाळी त्याची बरीच चर्चा झाली. सध्या मार्केट इकॅानॅामीचा जमाना आहे. फायदा, फायदा आणि अधिक फायदा या सूत्राप्रमाणे जग पळत आहे. सुखाच्या मागे पळून पळून प्रत्यक्षात मात्र दुःखी होत आहे. अशा काळात प्रधानसरांनी घालून दिलेला स्वार्थत्यागाचा वस्तुपाठ हा सहजासहजी कोणाचा विश्‍वास बसणार नाही असा आहे.

प्रधानमास्तरांना मास्तर ही उपाधी मिळाली ती मुख्यत्वे राष्ट्र सेवा दलातील त्यांच्या बौध्दिकांमुळे. फर्ग्युसन कॅालेजात सर इंग्रजी साहित्य हा विषय शिकवायचे. पण राष्ट्र सेवा दल, छात्रभारती, युक्रांद या संघटनांच्या शिबीरांमधे सहभाग घेऊन त्यांनी लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद, भारतीय स्वातंत्र्यलढा व त्यातील मूल्यव्यवस्था अशा अनेक वैचारिक विषयाबाबत कार्यकर्त्यांची मनोभूमिका घडविण्याचे काम केले. या बौध्दिकांसाठी ते महाराष्ट्रभर फिरले. राज्यशास्त्र व समाजशास्त्राचे अभ्यासक आणि वाचनप्रेमी नागरिकांसाठी प्रधान सरांनी सर्वात महत्त्वाचे जर कुठले काम केले असेल तर ते म्हणजे त्यांनी लिहून ठेवलेली ग्रंथसंपदा हे आहे.
स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत, साता उत्तराची कहाणी, महाराष्ट्राचे शिल्पकार एस. एम. जोशी, महाराष्ट्राचे शिल्पकार नानासाहेब गोरे, भाकरी की स्वातंत्र्य ( भाषांतरित), ललित लेणी, डॅा. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच शब्दात अशी अनेक महत्वाची पुस्तके त्यांनी कार्यकर्त्यांच्या व नागरिकांच्या वैचारिक पोषणासाठी लिहिली. भारतीय राजकारणाचे दोन पैलु : लोकशाही आणि समाजवाद हे पुस्तक लिहून झाल्यावर त्या पुस्तकातील “भविष्यातील समाजवाद” हे शेवटचे प्रकरण लिहीण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली तेंव्हा मला झालेला आनंद मी आजही शब्दात मांडू शकत नाही. भविष्यातील समाजवादाविषयी मी लिहीलेले टीपण त्यांनी जसेच्या तसे पुस्तकात समाविष्ट केले आणि मनोगतात त्याबाबत अभिमानाने तसा उल्लेखही केला. 18 वर्षे आमदार राहिलेला आणि त्यातील दोन वर्षे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद भूषवलेला हा माणूस इतक्या साधेपणाने रहायचा, साधेपणाने बोलायचा की तो या जगातला वाटूच नये. “मी पण त्यांचे पक्व फळापरी, सहज गळून पडले हो”,
यातील मतियार्थ त्यांनी पूर्णतः आत्मसात केला होता असे म्हणावे लागेल, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. एरवी अत्यंत शांतपणे व नेमकेपणाने बोलणारे व कार्यकर्त्यांना साभाळून घेणारे प्रधानसर वैचारिक भूमिका घेण्याची वेळ आल्यावर मात्र अत्यंत कठोर होत असत. स्पष्ट भूमिका घेत असत. वेळप्रसंगी त्यासाठी कार्यकर्त्यांवर रागवतही असत. पण हा राग तात्कालिक असे. शांत झाले की पुन्हा त्यांचा तो मूळचा स्नेहाचा झरा कार्यकर्त्यांना अनुभवायचा मिळत असे.

साधना साप्ताहिकाचे संपादकपद हा प्रधान मास्तरांच्या जीवनातील महत्वाचा थांबा. निवडणूकीच्या राजकारणातून निवृत्त होऊन स्वतः होऊन स्विकारलेली जबाबदारी. प्रधान मास्तरांच्या काळात लोकशाही समाजवाद आणि सामाजिक न्याय अशा संविधानिक मुल्यांबरोबरची साधनेची बांधिलकी आणखी ठसठशीतपणे पुढे आली. मास्तरांच्या काळात साधनेला आर्थिक स्थैर्यही मिळाले. तिथेही स्थिरसावर होताच त्यांनी ही जबाबदारी नरेंद्र दाभोलकर यांचेवर सोपवली व स्वतः बाजूला होऊन आपला लेखन संकल्प पुरा करण्यासाठी उरलेले आयुष्य व्यतित केले.

प्रधानसरांच्या मृत्यूपूर्वी प्रधान सरांनी एक साधी चिठ्ठी डॅा. नरेंद्र दाभोलकरांच्या हाती देऊन ठेवली होती. त्यात त्यांनी लिहिले होते. माझ्याबद्दल प्रेम अथवा स्नेहभाव बाळगणाऱ्या प्रत्येकाने किमान एकतरी झाड लावावे आणि ते निष्ठेने जगवावे. माझ्या मृत्यूनंतर यापेक्षा वेगळे कुठलेही उपचार आणि भाषणे नकोत. आपण गेल्यावर आपले नाव जरी लोकांच्या विस्मृतीत गेले तरी चालेल पण वृक्षरुपाने आपल्या स्मृती कायम रहाव्यात आणि त्या वृक्षांनीच जनांना सावली, आधार देण्याचे काम पुढे चालू ठेवावे ही अपेक्षा बाळगणारे प्रधान सर म्हणजे खरोखर गांधीवादी जीवनशैलीचे अनोखे उदाहरण होते.
आमच्या पिढीला म. गांधी बघायला मिळाले नाहीत, त्यांचा सहवासही लाभला नाही. पण मा. गांधीजींच्या सहवासात राहिलेले, स्वातंत्र्यलढ्याची उर्मी प्रत्यक्ष जगलेले, स्वातंत्र्यलढ्यातील मूल्यांना अभिप्रेत असा भारत बनविण्यासाठी आयुष्यभर झिजलेले प्रधान मास्तर आमच्यासाठी लिहीत होते. बोलत होते आणि आम्ही त्यातून घडत होतो. जातानाही आमच्यासाठी, वैचारिक शिदोरी आणि साध्या राहणीचा मोठा वारसा आमच्यासाठी ठेवून गेलेल्या प्रधान मास्तरांना विनम्र अभिवादन!