NEET मध्ये कमी गुण, 19 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या | अहिल्यानगर हादरलं
अहिल्यानगर जिल्ह्यातून अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जलालपूर येथील 19 वर्षीय अंकिता सुरेश सांगळे हिने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, अंकिताला नीट परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने ती मानसिक तणावात होती. तिला 300 पेक्षा अधिक गुणांची अपेक्षा होती, मात्र तिला 166 गुण मिळाले.
घटनेनंतर पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत व्यक्त करत, “माझ्या आत्महत्येसाठी माझे आई-वडील, भाऊ किंवा इतर कोणालाही जबाबदार धरू नये,” असे तिने लिहिले आहे.
या प्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, खासदार निलेश लंके यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन या विषयावर संसदेत आवाज उठवणार असल्याचे सांगितले आहे.
जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी मानसिक तणावाचा सामना करत असेल, तर विश्वासू व्यक्तीशी किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी त्वरित संवाद साधा. वेळेवर मिळालेली मदत जीवन वाचवू शकते.





