पुणे

मोदी सरकारने दिला मध्यमवर्गीयांना धोका महागाईने मोडले सामान्य माणसाचे कंबरडे – माजी आमदार मोहन जोशी

पुणे – महागाईचा दणका देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मध्यमवर्गीयांचा केवळ अपेक्षाभंगच केला नाही तर, धोकाही दिला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

पेट्रोल, डिझेल, इंधनाच्या दरवाढीवर मोदी सरकारने नियंत्रण ठेवले नाही, भाव वाढत राहिले. पर्यायाने खाद्यतेल, दूध, आदी जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले. महागाईने गरीब, मध्यमवर्ग त्रस्त झाला. पुण्यात पेट्रोल लिटरमागे १२०रुपये झाले. पेट्रोल, डिझेलचे दराची शंभरी केव्हाच ओलांडली आणि आता घरगुती गॅस सिलिंडरमध्ये ५० रुपये दरवाढ करून त्याची किंमत एक हजार रुपये केली आहे. गॅस दरवाढीने गरीब, मध्यमवर्गाचे घरगुती बजेट कोलमडलेच शिवाय चहा, खाद्यपदार्थ यांचेही भाव वाढणार आहेत. महागाई अशी चौफेर वाढत असताना भाजपचे नेते मूग गिळून गप्प बसले आहेत हे संतापजनक आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाने गरीब, मध्यमवर्गाचा नेहमीच कैवार घेतला. २०१४ पर्यंत केंद्रात काँग्रेस आघाडी सरकार होते. त्यावेळी घरगुती गॅस सिलिंडरचा दर ४१० रुपये होता. सरकार ८२७ रुपये सबसिडी देत होते. आठ वर्षात भाजप सरकारने सिलेंडर चा दर ४१०रुपयांवरून १०००रुपयांवर नेऊन ठेवला आहे. देशातील गरीब, मध्यमवर्गाचे जीणे हैराण करुन मोदी सरकारने केवळ अपेक्षाभंग केला नसून त्यांना धोकाही दिला आहे.

महागाई विरोधात काँग्रेस पक्ष सतत आंदोलन करत आला असून यापुढेही जनतेचा आवाज मांडत राहील, असे जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.