पुणे

राज्यातील बहुचर्चित मतदारसंघ “माढा” मधून शरद पवार यांनी का घेतली माघार?

पुणे:  (रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन)

माढ्यातून मी उभं राहावं असा आग्रह पक्षातून होतोय असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली. पवार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात का उतरू इच्छित आहेत. त्याची अनेक कारणं दिली गेली. पवार पंतप्रधानपदासाठी दावेदार आहेत असंही बोललं जावू लागलं. मात्र पवारांनी आज माढा मधून उभे राहणार नसल्याचं स्पष्ट केलं. याची  5 मुख्य कारणं सांगितली जात आहेत.

1) पवारांनी घेतला अंदाज
2009 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार माढ्यातून विक्रमी बहुमताने जिंकून आले. 2014 मध्ये मात्र त्यांनी आता निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर करत राज्यसभेत जाणं पसंत केलं. त्यानंतर परिस्थिती बदलल्याने पवारांनी निवडणुकीसाठी लोक आग्रह करत असल्याचं सांगत खडा टाकून पाहिला. राजकारणाचा अचूक अंदाज पवारांना येतो. मात्र माढ्यात स्थानिक राजकारण विकोपाला गेल्याचं लक्षात आल्याने कुठलाही धोका घेण्याचं पवारांनी टाळल्याचं बोललं जातंय.

2) गटातटाचं राजकारण

माढ्यात राष्ट्रवादीमध्ये अनेक गट तट आहेत. आमदार बबन शिंदे आणि संजय शिंदे यांचा एक गट, विजयसिंह मोहिते पाटलांचा दुसरा गट, अजित पवार समर्थकांचा तिसरा गट, दिपक साळुंखे यांचा चवथा गट असे अनेक गट आहेत. बबन शिंदे यांचा मोहिते पाटील यांना विरोध आहे. साळुंखे यांचाही मोहिते पाटलांना विरोध आहे. मोहिते पाटील यांचं आणि शरद पवारांचं चांगलं जमतं मात्र अजित पवार आणि मोहिते पाटील यांचं जमत नाही. हे राजकारण आता एवढं विकोपाला गेलं की पवारांनी समजूत घालूनही ते शांत व्हायला तयार नाहीत. त्यामुळे थेट शरद पवार उभे राहिले तरी दगाफटका होण्याचा धोका होता.

3) मोहिते पाटलांचा प्रभाव ओसरतोय

अकलुजच्या विजयसिंह मोहिते पाटलांचा माढ्यात प्रभाव आहे. मात्र दिवसेंदिवस त्यांचा प्रभाव ओसरतोय. त्यात अजित पवार आणि महिते पाटलांचं पटत नाही. त्यामुळे गेली काही वर्ष राष्ट्रवादीत मोहिते पाटील यांची उपेक्षा होत होती. फक्त शरद पवार उभे राहिले तरच माझा पाठिंबा असेल असं पवारांना त्यांनी सांगितलं होतं. त्यातच मोहिते पाटलांच्या साखर कारखाण्याने शेतकऱ्यांचे पैसे थकवले, सुमित्रा पतसंस्था बुडाली यामुळे मोहिते पाटलांवरही लोक नाराज होते.

4) पवारांचा थेट संपर्क तुटला

2009 मध्ये शरद पवार माढ्यातून विक्रमी मतांनी विजयी झाले. पण लोकांना आशा होती तसं माढ्याचं काही बारामती झालं नाही. त्यातच गेली पाच वर्ष पाहिजे तसा संपर्क राहिलेला नव्हाता. 2009 मध्ये केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याने त्याचा फायदा झाला. 2014 च्या निवडणुकीत सदाभाऊ खोत यांनी दिग्गज असलेल्या मोहिते पाटलांना फेस आणला होता. पाटील 28 हजारांनी विजयी झाले होते.

5) अडकून पडायला नको

निवडणुकीत प्रत्यक्ष उभे राहिलं की त्या मतदार संघात वेळ द्यावा लागतो. त्यामुळे प्रचाराला बाहेर पडता येत नाही. त्याच मतदार संघात अडकून राहावं लागतं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचार करण्यास अडचण येण्याची शक्यता होती. त्यामुळे पवारांनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचं टाळलं.

0 0 votes
Article Rating
6 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments