
लोकसभा निवडणूक राजकीय आखाडा विशेष
शिरूर (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
शिरूर लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात हॅटट्रिक खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने युवा नेतृत्व डॉ. अमोल कोल्हे यांच्यासारखा तगडा उमेदवार दिल्याने येथे चांगलीच राजकीय आरोप प्रत्यारोपांची
खडाखडी रंगली आहे. आढळराव चौकार मारतात की नव्या दमाचा राष्ट्रवादीचा उमेदवार धोबीपछाड देणार या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

खासदार आढळराव यांनी राष्ट्र वादी काँग्रेसचा उमेदवार हा माळी समाजाचा असून मी मराठा समाजाचा उमेदवार असल्याचे सांगत ही निवडणूक माळी-मराठा अशी करण्याचा प्रयत्न चालविल्याची चर्चा सध्या आहे, तर मी शिवरायांचा मावळा असून माझी जात महत्वाची नाही हे सांगत डॉ कोल्हे यांनी सर्वधर्मीय मतदारांमध्ये सहानुभूती निर्माण केलेली दिसून येत आहे.
खासदारकीची 3 टर्म भेटूनही शिरूर लोकसभा मतदार संघात उल्लेखनीय अशी विकासकामे आढळराव यांना करता आली नाहीत, शिवनेरी-वढू-तुळापूर ही संभाजी राजांची समाधीक्षेत्रे अष्टविनायक मधील ओझर, रांजणगाव ही तिर्थक्षेत्रे मतदार संघात आहेत पण त्यांच्या विकासाकरिता खासदार आढळराव यांनी काय केले ?

खेड विमानतळाचे पुरंदर तालुक्यात झालेले स्थलांतर, बैलगाडा शर्यतीबाबत नुसती आश्वासने या सर्वच अडचणीच्या प्रश्नांवर आढळराव यांच्यावर कोल्हे यांच्यासह विरोधकांनी तोफ डागली असून मंगलदास बांदल आणि माजी आमदार विलास लांडे यांना उमेदवारी मिळाली नाही तरी त्यांची नाराजी दूर होऊन त्यांनी कोल्हे यांच्या प्रचारात स्वतःला झोकून दिले तर निश्चितच आढळराव यांना विजयासाठी झगडावे लागणार आहे.
या मतदार संघात माळी समाजाची निर्णायक मत आहेत, हडपसर व जुन्नर आणि शिरूर तालुक्यात मोठ्या संख्येने असलेल्या माळी समाजात सध्या आढळराव यांनी मी मराठा उमेदवार म्हणून चालविलेला स्वतःचा प्रचार हा चर्चेचा विषय झालेला आहे, त्यामुळे हा समाज कोल्हे यांच्यासाठी एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे, दुसरीकडे मराठा समाजातही डॉ. कोल्हे यांच्या स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिका आणि त्यांनी शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांची साकारलेली भूमिका यामुळे सहानुभूतीची सुप्त लाट आहे, या सर्वच बाबी कोल्हे यांना जरी अनुकूल असल्या तरी मतांमध्ये त्याच परिवर्तन करण्यात ते कितपत यशस्वी होतात यावर सार काही अवलंबून आहे. राष्ट्रवादीच्या गटातटाचा फटका कोल्हे यांना बसू शकतो.

दुसरीकडे खासदार आढळराव यांनी आपला राजकीय अनुभव पणाला लावत मनसेचे आमदार शरद सोनवणे याना सेनेत आणून जोरदार मोर्चा बांधणी सुरू केली आहे, मराठा समाजाचा उमेदवार ही आपली ओळख ते ठासून सांगत आहेत,14 हजार कोटी रुपयांची विकासकामे केली असा दावा करीत मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. प्रत्येक निवडणुकीत आढळराव यांना राष्ट्रवादी काँग्रेस मधील अंतर्गत गटबाजीचा फायदा झाला, यावेळी माजी आमदार लांडे व मंगलदास बांदल यांचे समर्थक नाराज आहेत, त्यांची नाराजी आढळरावं यांना किती फायदेशीर ठरेल याची उत्सुकता ही सर्वांना आहे, पण एकंदरीत जुन्नर आणि हडपसर हे दोन मतदार संघ या निवडणुकीत निर्णायक भुमीका बजावणार आहे हे ही तितकेच खरे आहे.

शिरूर लोकसभा मतदार संघातील मुख्य रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी, रोजगार, वाढती गुन्हेगारी, खासदारांचा फक्त निवडणुकीपूरता जनसंपर्क, विकास कामांचे खोटे दावे या सर्वच मुद्द्यांवर ही निवडणूक खेळली जाणार हे स्पष्ट झाले असून पुणे जिल्ह्याचे लक्ष डॉ कोल्हे व खासदार आढळराव यांच्या लढतीने वेधून घेतल्याने ही निवडणूक चांगलीच रंगतदार होणार असल्याचे दिसून येत आहे.

