अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरात विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक आणि खंडणीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राहाता पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका शेतकरी तरुणासह त्याच्या मित्राची सुखरूप सुटका केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीतील विवाहेच्छुक शेतकरी तरुणाला लग्नासाठी मुलगी दाखविण्याच्या बहाण्याने साकुरी येथे बोलावण्यात आले.
यानंतर आरोपी महिलांनी तब्बल २ लाख ३० हजार रुपयांची मागणी करत आर्थिक व्यवहारासाठी दबाव टाकला. फिर्यादीने कोर्ट मॅरेजचा आग्रह धरताच त्याला आणि त्याच्या मित्राला घरात डांबून ठेवण्यात आले.
तसेच नातेवाईकांकडे खंडणीची मागणी केल्याचा आरोप आहे. माहिती मिळताच राहाता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांची सुटका केली.
या प्रकरणी रेश्मा काटे, मंगल पठारे आणि सुगंधा गायकवाड या तिघींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
लग्नाच्या नावाखाली मोठा सापळा! शेतकरी तरुणाला डांबून खंडणीची मागणी
