कोल्हापुर (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
एकीकडे लोकापवादाच्या भयाने किंवा समाज बिराजदरीच्या भ्रामक दडपणातून उरली-सुरली इस्टेट विकून लग्नसमारंभ करणारी मंडळी असली तरी दुसरीकडे अल्पखर्चात आदर्श विवाह उरकणारीही मंडळी आहेतच. कोल्हापुरात असाच एक आदर्श विवाह करण्यात आला. या विवाहाचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे. या विवाहाची राज्यभर चर्चा होत आहे.
डॉ. सौरभ तुपकर हे स्वतः एम.बी.बी.एस. पदवी घेऊन उच्चशिक्षित आहेत. स्पर्धा परीक्षा देऊन आजमितीस ते राधानगरी कोल्हापूर येथे भूमिअभिलेख कार्यालयात उपअधिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या घरची आर्थिक स्थिती अगदी उत्तम आहे. करोडो रुपये खर्चुन शाही पध्दतीने विवाह सोहळा करु शकले असते पण आपल्या समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण व्हावा, ही त्यांची मनस्वी इच्छा होती. आपली ही ईच्छा डॉ. सौरभ यांनी आपल्या घरातील मंडळींना बोलून दाखविली. त्यानंतर बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील अॅड. तात्यासाहेब सोळंके यांची कन्या डॉ. रोहिणी हीसुध्दा एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेतलेली. स्पर्धा परिक्षेनंतर त्या पोलीस सेवेत आल्या. आजमितीस डॉ. रोहिणी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील पोलीस उपअधिक्षक आहेत. डॉ. रोहिणी आणि डॉ. सौरभ यांच्या विवाहाचा संकल्प निश्चित झाला आणि लग्न अगदी साधेपणाने आणि कमी खर्चात करण्याचा निर्णय दोघांनी घेतला. निर्णयानुसार नोंदणी कार्यालयामध्ये 5 फेब्रुवारी 2019 रोजी विवाह संपन्न झाला.
विवाहाला एकूण खर्च 2 हजार 500 रुपये आला. हा खर्चसुध्दा वधु-वरांच्या मित्रमंडळींनी केला. कोल्हापूरचे मुद्रांक जिल्हाधिकारी शिवश्री सुंदर जाधव यांनी उभयतांना विवाह प्रमाणपत्र दिले आणि पुस्तकरुपी भेटवस्तू आहेर देऊन दोघांना आशिर्वाद दिले. विवाह समारंभ पार पाडल्यानंतर सर्वांनी जेवणावळीचा आग्रह धरला. नोंदणी विवाह पध्दतीमध्ये विवाह करतांना डॉ. सौरभ यांचे सोबत 7 तर डॉ. रोहिणी यांचेसमवेत 5 मित्रमैत्रिणी होत्या. अशी ही 14 जणांचे वर्हाड मग एका शुध्द शाकाहारी भोजनालयात दाखल झाले. त्या ठिकाणी जेवणावळीचा खर्च 1800 रुपये झाला. त्याआधी वर-वधुंचे हार, बुके, पेढे आदींसाठी 700 रूपये खर्च झाला. हा सर्व एकुण 2500 रूपयांचा खर्च वर-वधु यांनी केला नाही. दोघांच्या मित्रमैत्रिणींना हा अडीच हजाराचा खर्च केला. कोणताही आहेेर नाही, भेटवस्तू नाही, बॅन्ड वाजा बारात नाही. नवरदेवाचा कोट नाही. नवरीचा शालू नाही, नवरीचा मेकअप करणारी ब्युटीशिअन नाही, शुटींग व फोटोसाठीचा ड्रोन कॅमेरा नाही, संगीत रजनी, ऑर्केस्ट्रा नाही, बुफे नाही. जेवणावळी नाही, मानपान आहेर नाही, वाजंत्री-डीजे नाही, लग्नापूर्वीचे प्री-वेंडींग फोटोसेशन नाही, पत्रिका नाही, हुंडा नाही, भटजी नाही अन् मंगलाष्टकेही नाहीत. आहे त्याच नेहमीच्या कपड्यांवर या आदर्श जोडप्याने नोंदणी पध्दतीने विवाह लाऊन घेतला. आणि मोठा आदर्श समाजासमोर ठेवला.
