सर्जिकल स्ट्राईकवर शंका घेणाऱ्या राहुल गांधी यांच्या अंगावर स्फोटके बांधून त्यांना दुसऱ्या देशात सोडले
पाहिजे : पंकजा मुंडे यांची टीका
मुंबई (न्यूजलाईन)- भारतीय वायूदलाच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर शंका घेणाऱ्या राहुल गांधी यांच्या अंगावर स्फोटके बांधून त्यांना दुसऱ्या देशात सोडले पाहिजे, असे वक्तव्य राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. त्या रविवारी जालना येथील प्रचारसभेत बोलत होत्या. यावेळी पंकजा यांनी म्हटले की, पुलवामात दहशतवाद्यांना केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक केला. मात्र, काही जण हा सर्जिकल स्ट्राईक नेमका कसा झाला, हे विचारत आहेत. त्याचे पुरावेही मागत आहेत. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचाही समावेश आहे. माझ्या मते त्यांच्या अंगावर स्फोटके बांधून त्यांना दुसऱ्या देशात सोडले पाहिजे. मग त्यांना नेमकी परिस्थिती समजेल, असे पंकजा यांनी म्हटले.
पंकजा यांच्या या वक्तव्याला आता काँग्रेस कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी पंकजा यांनी अशाप्रकराची वक्तव्ये करून अनेकदा वाद ओढवून घेतला आहे.
मोदी सरकारने सर्जिकल आणि एअर स्ट्राईकमध्ये नक्की किती दहशतवादी ठार झाले, याचे पुरावे द्यावेत, अशी मागणी काँग्रेससह विरोधकांनी लावून धरली होती. मात्र, मोदी सरकारने ही मागणी फेटाळत विरोधकांना फटकारले होते.
