पुणे

पर्यटनाचा, नयनरम्य निसर्गाचा आनंद घेऊ या तोही सर्व सुरक्षिततेचे नियम पाळून !! जेष्ठ पत्रकार सुधीर मेथेकर यांचा विशेष लेख खास रोखठोक महाराष्ट्र न्युज वाचकांसाठी

पर्यटनाचा, नयनरम्य निसर्गाचा आनंद घेऊ या तोही सर्व सुरक्षिततेचे नियम पाळून !!

जेष्ठ पत्रकार सुधीर मेथेकर यांचा विशेष लेख खास रोखठोक महाराष्ट्र न्युज वाचकांसाठी

निसर्गाच्या सानिध्यात आनंद उपभोगता यावा यासाठी केलेले नियोजन म्हणजे पर्यटन ! परंतु अतिउत्साही मंडळी आपल्या जीवाची पर्वा न करता साहस करायला जातात अन् मग संकटात सापडतात. कधी कधी या मंडळींचा अतिउत्साह स्वतः च्या जीवावर बेततो ! त्याच बरोबर जी मंडळी कुठेतरी अवघड ठिकाणी अडकतात त्यांना सोडवून (रेस्क्यू ऑपरेशन) आणण्यासाठी मदत करायला जाणारे जातात अन् त्यांच्या जीवावर बेतते ! हे नक्कीच क्लेशदायक आहे ! हे आपल्याला समजत नाही असे नाही, समजते परंतु उमजत नाही हे खेदाने म्हणावे लागते.

निसर्गाच्या सानिध्यात नक्कीच पर्यटनासाठी जायला हवं परंतु आपल्या गैरवर्तनामुळे निसर्गाला त्याच बरोबर आपल्याला हानी पोहचू नये असे आपले वर्तन हवे.

विशेष करून पावसाळ्यात अनेक निसर्गातील स्थळे, नयनरम्य दृश्य आपल्याला खुणावत असतात. पडणारा पाऊस, हिरवा शालू पांघरलेल्या डोंगराच्या रांगा, हिरवीगार झाडे आपले मनमोहून जाते, उंचावरून पडणारे पाण्याचे धबधबे, उडणारे तुषार आंगावर झेलण्यात एक वेगळा आनंद देऊन जातात. या नयनरम्य निसर्गाच्या सानिध्यात खवय्येगीरी तर आलीच ! गरमागरम भूट्टे अर्थात मक्याचे कणीस, गरमागरम भजी, वाफयलेला चहा याचा आपण नक्कीच आनंद घ्यायला हवाच.

हा आनंद द्विगुणित करत असताना मात्र याला आपल्या अतिउत्साहामुळे कुठेही गालबोट लागूनये असे वाटते. विविध प्रसारमाध्यमे सुध्दा आपल्याला वेळोवेळी सूचना देऊन सतर्क करत असतात, त्यांच तसेच परिसरातील नागरिकांचे, सुरक्षारक्षकांच्या सुचनांचे पालन करायला हवे अन्यथा आपल्याला आलेल्या संकटांना तोंड द्यावे लागेल, कुटुंबातील व्यक्तींना मनस्ताप सहन करावा लागेल याचे भान ठेवायला हवे. नाही तर………!

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे, नद्या नाल्यांना पुर आलेला आहे. काही ठिकाणी पुल पाण्याखाली गेले आहेत अशा वेळी अतिउत्साहाने स्वतः चा जीव धोक्यात घालू नये व दुसऱ्याचा देखील जीव धोक्यात घालू नये. नुकतीच एक दुर्घटना टिव्हीवर दाखविण्यात आली, त्यात सुमारे 17-18 पर्यटक आडकले होते, त्यांना सुरक्षित स्थळी आणतांना काहींना स्वतःचा जीव धोक्यात घालावा लागला याचे भान ठेवावे !

खरं तर आपल्या घरातील जेष्ठ मंडळी नेहमी सांगत आले आहेत की, आपण आप, तेज व वायू याच्याशी मस्ती करायची नसते ! जर आपण त्याच्याशी मस्ती करायला गेलो तर त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात हे ध्यानी असू द्यावे !

चला तर मित्र/मैत्रीणीनो आपण पर्यटनाचा, नयनरम्य निसर्गाचा आनंद घेऊ या तोही सर्व सुरक्षिततेचे नियम पाळून !!