चिकलठाणचा रस्ता की खड्ड्यांचा सापळा? पावसात चिखल-पाण्यामुळे नागरिक, विद्यार्थ्यांचे हाल
कन्नड तालुक्यातील चिकलठाण गावातील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून पावसामुळे चिखल आणि पाणी साचत असल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
चिकलठाण गावातील या रस्त्यावरून दररोज नागरिक, शाळकरी विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी ये-जा करतात. मात्र रस्त्याची दुरवस्था झाल्याने पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना तसेच पायी जाणाऱ्या नागरिकांना कसरत करावी लागत आहे.
गेल्या काही काळापासून रस्त्याची अशीच अवस्था असूनही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी चिकलठाण ग्रामस्थांकडून होत आहे.





